मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून महिलांचा वापर; भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे
27-Jun-2023
Total Views | 41
नवी दिल्ली : शाहिनबाग आणि कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून भारतीय सैन्यासह सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्यासाठी महिलांचा ढाल म्हणून वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मणिपूरमध्ये गेल्या महिन्याभरापासून संघर्षाची स्थिती आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य पोलिस, केंद्रीय सुरक्षा दले आणि भारतीय सैन्याच्या तुकड्या कार्यरत आहेत. मात्र, हिंसक गटांकडून भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे आणले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हिंसक गटांकडून ढाल म्हणून महिलांचा वापर केला जात आहे.
भारतीय सैन्याच्या स्पीयर्स कॉर्प्सने त्याविषयी निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, मणिपूरमधील महिला कार्यकर्त्या जाणूनबुजून सैन्यदलाचा मार्ग अडवत आहेत आणि सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करत आहेत. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गंभीर परिस्थितीत सुरक्षा दलांनी वेळेवर दिलेल्या प्रतिसादासाठी असा अनावश्यक हस्तक्षेप हानिकारक आहे. भारतीय लष्कर सर्व घटकांना शांतता प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
इम्फाळ पूर्वेकडील इथम गावात लष्कर आणि महिलांच्या नेतृत्वाखालील जमावामध्ये झालेल्या संघर्षामध्ये १२ हल्लेखोरांची सुटका करून केवळ शस्त्रे जप्त करण्याचा निर्णय लष्करास घ्यावा लागला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने हे निवेदन जारी केले आहे.
महिलांना पुढे करण्याचा अराजकतावाद्यांना पॅटर्न
महिलांना पुढे करून हिंसाचार करण्याचा पॅटर्न सध्या भारतात अराजकतावादी वापरत आहेत. देशाची राजधानी दिल्ली येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहिनबाग येथे बसविण्यात आलेले आंदोलन, त्यानंतर दिल्लीत झालेली दंगल, कथित शेतकऱ्यांचे आंदोलन, दिल्लीमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रेवर हल्ला करणे; अशा प्रकरणांमध्ये महिलांना पुढे करूनच दंगल घडविण्याच आल्याचे दिसून आले होते. आता मणिपूरमध्येही हाच प्रकार होत आहे.