पुण्याला बालेवाडीमध्ये तीन दिवसांचे घोष शिबीर होतं. नक्की साल आठवत नाही. त्यावेळेस मी पणव वादक म्हणून भाग घेतला होता. वसई तालुक्यातून घोष शिबिरात गेलो होतो. तिथे जयंतरावांची ओळख झाली. मी जुने प्रचारक अनंतराव देवकुळे, शिवरायजी तेलंग, वसंतराव केळकर, दामू अण्णा दाते यांसारखे प्रचारक अगदी जवळून पाहिले आहेत. जयंतराव अशाच जुन्या प्रचारकांसारखे मला वाटले. त्यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी एखाद्याचे मन सहज जिंकून घेत असे.
एखाद्या व्यक्तीचा त्यांच्याशी झालेला परिचय ती व्यक्ती खूप दिवसांनी भेटल्यावरसुद्धा त्या व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता त्यांचा स्मरणात असे. एका कार्यक्रमात त्यांनी संस्कृतमधून बौद्धिक दिले होते. त्यांनी इतक्या अस्खलित व स्वयंसेवकांना समजेल अशा भाषेत ते बौद्धिक दिले. त्यांचे संस्कृत वाखाणण्याजोगे होते.मी द्वितीय वर्षाला असताना मला त्यांचे बौद्धिक ऐकण्याचा योग आला. शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांची नावे लक्षात ठेवून ते त्यांच्या संपर्कात राहत असत. या त्यांच्या गुणाचे कौतुक वाटत असे. त्यांनी मला वैयक्तिकरित्या भेटून घोषातील माझ्या वादनाचे कौतुक केले होते. परंतु, या वादनाला मी पात्र होतो की नाही, हे मला माहीत नाही. एखाद्या व्यक्तीला आपलेसे करून संघविचार त्याच्या मनात सहजपणे रुजवणे, ही त्यांची कला होती.
काही वर्षं ते गोव्याचे प्रांत प्रचारक होते, त्यावेळेस ते माझे मोठे बंधू यशवंत पराडकर यांच्या घरी वरचेवर जात असत. आमच्या कुटुंबाला ते वैयक्तिकदृष्ट्या ओळखत असे. त्यांची एक आठवण माझ्या पुतणीने सांगितली ती इथे नमूद करावीशी वाटते. बारावीनंतर माझी पुतणी पुण्याला पुढील शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती. त्याचदरम्यान जयंतराव संघकामासाठी फर्ग्युसन महाविद्यालयामधील प्राध्यापक, प्राचार्य आदींना भेटण्यासाठी जात असत. त्यावेळेस जयंतरावांना माझी पुतणी तिथे शिकत असल्याचे समजले. जेव्हा जेव्हा ते फर्ग्युसन महाविद्यालयाला कामानिमित्त जात असत, तेव्हा तेव्हा ते माझ्या पुतणीला न चुकता भेटत असत. त्यामुळे तेथील प्राध्यापक व प्राचार्य यांनी आश्चर्याने तिला विचारले होते की, “एवढी महान व्यक्ती तुला कशी ओळखते?“ या प्रसंगावरून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. ही माझ्या पुतणीने सांगितलेली एक आठवण...
जेव्हा जयंतरावांकडे ‘विज्ञान भारती’ची जबाबदारी आली, त्यावेळेस मी मुंबईमध्ये नोकरी करीत होतो. एका ‘विज्ञान भारती’च्या दादर येथील कार्यक्रमासाठी व्यवस्थेमध्ये कार्यकर्त्यांची जरुरी होती.मला अचानक एका अपरिचित नंबरवरून ‘मी जयंत सहस्रबुद्धे बोलतोय‘ अशा एकेरी नावाने फोन आला. त्यांनी मला आदरार्थी संबोधून कार्यक्रमासाठी ‘कार्यकर्ता‘ म्हणून येण्याची विनंती केली. त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध वैज्ञानिक अनिलजी काकोडकर उपस्थित होते. जयंतरावांमुळेच मला अशा महान व्यक्तीला भेटण्याचे भाग्य लाभले. कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले.नाशिक येथील श्रीगुरूजी रुग्णालय पाहण्यासाठी आम्ही उभयता गेलो असता, काही ठरावीक रक्कम रुग्णालयास देणगी म्हणून आम्ही दिली आणि मी जयंतरावांना आनंदाने दूरध्वनीवरून ही बातमी आपुलकीच्या नात्याने सांगितली. तो दिवस विवेकानंद जयंतीचा होता.
मी एक लाख रुपयांपर्यंत रुग्णालयास देणगी मिळवून देण्याचा माझा संकल्प जयंतरावांकडे व्यक्त केला. त्यावर त्यांनी मिश्किलपणे सांगितले, “तुझ्यासारख्याने अडीच कोटी रुपये देणगी जमवून देणे अपेक्षित आहे.“ त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच मी काही लाख रुपये रक्कम जमा करू शकलो. एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहित करून आपल्या मनातील समाजासाठी योग्य असलेले कार्य दुसर्या व्यक्तीकडून सहजरित्या घडवून आणणे, ही त्यांची हातोटी होती. यामुळे ते माझ्या स्मरणात चिरकाल राहतील.प्रत्येक प्रचारक हा त्यागी असतोच. परंतु, जयंतराव सहस्रबुद्धे यांच्यासारखा बहुआयामी प्रचारक विरळाच! अशा सर्वांच्या लाडक्या जयंतरावांना माझी व माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
(गोरेगाव पूर्व, ९२२४६८५९४०)