मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर चित्रपटाची लेखिका आणि शाहीर साबळे यांची मुलगी वसुंधरा साबळे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून शैक्षणिक क्षेत्रातील बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत टिपण्णी केली. यावेळी समाजातील जातीय तेढ वाढीस लागेल असे बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत अनेक नेटिझन्सनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटावर बहिष्कार टाकला आहे.
वसुंधरा साबळे म्हणाल्या, "एकच लक्षात ठेवा,आपल्या पुर्वजांनी गाजवलेला पराक्रम आणी समाजसुधारकांनी घडवून आणलेल्या सुधारणा यांच्यासहीत गेल्या सत्तर वर्षात देशात झालेल्या सुधारणा, सैनिकांनी चीन आणी पाकीस्तानला चारलेली धूळ या सर्व गोष्टी ईतिहासातुन गायब होतायत. मोगलांचा इतिहास पुसला की आपोआप शिवाजीमहाराजांचा पराक्रम पुसला जाणार आहे. आपल्या पुढच्या पिढ्या शालेय शिक्षणातून काय शिकवतील हे सांगता येत नाही. ब्राम्हणाव्यतिरिक्त एकही पराक्रमी या मातीत जन्माला नाही हेच सिध्द करतील. तुकाराम महाराज तर औषधालाही शिल्लक ठेवणार नाहीत. रामदासांचा उदोउदो सुरु झालेला आहे. सावध, ऐका पुढल्या हाका आणी आत्ता पासुन खरा इतिहास मुलांच्या डोक्यात घुसवा. 'माझ्या एकट्याच्याने काय होणार?' म्हणत गुमान बसणं परवडणार नाही आता."
वसुंधरा यांच्या या पोस्टवर आपली प्रतिक्रिया अनेकांनी मांडली आहे. दोन्ही चित्रपट पाहणार होतो परंतु आता केवळ केरळ स्टोरी चित्रपट पाहणार असे एकाने म्हंटले आहे तर एकाने या पोस्ट चा संदर्भ केदार शिंदे यांच्या वक्तव्याशी जोडला आहे. या अशा विचारांमुळे केदार शिंदे यांच्या डोक्यात असे प्रश्न येतात असे काहींचे म्हणणे आहे.