काँग्रेस नेत्यांची विधाने सडलेल्या मानसिकतेचे प्रतीक - नितेश राणे

    17-Apr-2023
Total Views | 40
(Nitesh Rane Exclusive Interview)
काँग्रेस नेत्यांची विधाने सडलेल्या मानसिकतेचे प्रतीक - नितेश राणे

“काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातील काही नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषशी आक्षेपार्ह विधाने करत आहेत. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला तरीही काँग्रेस नेते सावरकरांवर टीका करत आहेत. यासह राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीत निर्माण झालेली सुंदोपसंदी, ठाकरे पितापुत्राकडून सरकारवर केली जाणारी टीका, फडणवीस शिंदे सरकारचा कारभार आदि विषयांवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ’मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ओंकार देशमुख यांच्याशी साधलेला संवाद...
राज्यातील राजकारणात अचानक काही घटना घडत असून अनेक तर्क लढवले जात आहे. या राजकीय हालचाली होण्याचे नेमके काय कारण असेल?
- मागील दहा महिन्यांमध्ये राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ज्या प्रकारे अडीच वर्षे महाराष्ट्राचा विकासरथ महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अडकला होता, त्याला पुन्हा प्रगतीच्या महामार्गावर आणून राज्य सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न फडणवीस-शिंदेंकडून केले जात आहेत. राजकीय हालचाली होत असल्याच्या चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे राज्य सरकारने ’अंत्योदया’च्या उद्दिष्टाने जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत आणि त्याचा जो फायदा तळागाळातील लोकांना मिळत आहे याची जाणीव विरोधकांना झाली आहे. जनतेत सरकारबद्दल निर्माण झालेली सकारात्मकतेची भावना विरोधकांची धडकी भरवणारी ठरत असून विरोधक यामुळे घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांकडून जाणीवपूर्वकरित्या या चर्चा घडवल्या जात असून यामागे केवळ राजकीय स्वार्थ आहे. राज्याची प्रतिमा बदलण्याच्या फडणवीस-शिंदेंच्या प्रयत्नांमुळे घाबरलेल्या विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.”
महाविकास आघाडीकडून ’वज्रमूठ’ सभांचे राज्यभरात आयोजन केले जात आहे. त्यातून भाजप-शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न ‘मविआ’ करत आहे. या सभांना खरोखरच प्रतिसाद मिळत आहे, असं वाटतं का ?

- छत्रपती संभाजीनगरची सभा जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तीन पक्षांना एकत्र येऊन सभेसाठी लोक एकत्र करावे लागले. संभाजीनगरच्या सभेइतकी गर्दी, तर माझ्या लग्नातदेखील होती. तीन पक्ष एकत्र येऊनही जर सभेला लोक एकत्र करू शकत नसतील, तर जनतेत महाविकास आघाडीची स्वीकार्हता किती आहे, हे सांगण्याची काही गरज नाही. या सभेत जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले तेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्यावर हसत होते, हीच उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीत किंमत आहे. महाविकास आघाडीतील नेते ज्या पद्धतीने ठाकरेंना वागणूक देत आहेत त्यावरून भाजपचे काम सोपे झाले आहे, हे मात्र नक्की.”

एका बाजूला महाविकास आघाडी ’वज्रमूठ’ सभांच्या माध्यमातून एकीचे प्रदर्शन दाखवत असताना ‘मविआ’चे कर्तेधर्ते शरद पवार मात्र ठाकरे गट आणि काँग्रेस विरोधात भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीतील विसंवाद आणि सुंदोपसुंदीने परिसीमा गाठल्याचे हे द्योतक आहे ?

-२०२४ मध्ये ‘फिर एक बार मोदी सरकार’ याची जाणीव सर्वात आधी शरद पवार यांना झाली आहे. शरद पवारांना राजकीय वातावरणाचा अंदाज येतो, हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मान्य केले होते. जनमताचा कौल नेमका कुठल्या दिशेने आहे, याची पुरेपूर जाणीव पवारांना झाल्यानेच त्यांनी महाविकास आघाडीची अडचणीचे ठरू शकणार्‍या मुद्द्यांपासून बाजूला जाण्यास सुरुवात केली आहे. ‘अदानी प्रकरण’ असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल किंवा पंतप्रधानांविषयी केली जाणारी टिप्पणी यातून आपल्या हाती काहीही लागणार नाही, हे पवारांना समजले असून त्या जाणिवेतूनच त्यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसला सुनावले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत विसंवाद आणि सुंदोपसुंदी अंतिम टप्प्यावर आहे हे निश्चित आहे.”

काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान केला जात असून ’नॅशनल हेरॉल्ड’च्या संपादिकेनेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. सातत्याने येणार्‍या विधानांच्या मागे काही विशिष्ट हेतू आहे, असं वाटतं का ?

-”स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरून जनतेत मोठा संताप आहे हे आम्ही स्वतः अनुभवले आहे. भाजप शिवसेनेने काढलेल्या ‘सावरकर गौरव यात्रां’मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा चौपट अधिक सहभाग हा सर्वसामान्य जनतेचा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कुठल्या अधिकाराने स्वातंत्र्यवीरांचा अपमान करत आहेत? सावरकरांनी भोगलेल्या शिक्षेच्या पाच टक्केही शिक्षा भोगण्याची क्षमता या नेत्यांमध्ये नाही. सावरकर राहिले त्या खोलीत राहुल गांधींनी तासभर राहून दाखवावे, असे आव्हान मी त्यांना आज देतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि महापुरुषांचा अपमान करण्याची काँग्रेसची ही सडलेली मानसिकता अनेक दशकांपासूनची आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ची संपादिका छत्रपती शिवाजी महाराजांची सेना बलात्कारी होती, हे बोलण्याचे धाडस करते, याचा अर्थ यांची भूमिका काय ते नव्याने सांगायची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर आम्ही कुठल्याही महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही, हा इशारा आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देत आहोत. जर त्यांनी हे प्रकार बंद केले नाही तर त्यांना योग्य त्या भाषेत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आणि खंबीर आहेत, हा माझा इशारा त्यांनी गांभीर्याने लक्षात घ्यावा. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या विधानांमुळे उद्धव ठाकरेंचे मविआमध्ये खरे महत्त्व किती शिल्लक राहिले आहे, हे उघड झाले आहे. राहुल गांधी ‘मातोश्री’ तर सोडाच, पण कलानगरच्या कोपर्‍यापर्यंतही जाणार नाही, हे ठाकरेंनी लक्षात ठेवावे.

राज्य सरकारने हिंदुत्ववाविषयी घेतलेल्या निर्णयांमुळे अन्यायाची भावना मनात असलेल्या हिंदूंवर काय परिणाम होईल ?

- हिंदुत्वाची भूमिका आणि स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जाणारे हे सरकार आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवलेले आहे. शेकडो वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर होणारे अतिक्रमण काढण्यासाठी या सरकारची वाट जनतेला पाहावी लागली. अडीच वर्षांत हिंदूंना ‘टार्गेट’ करण्याचे आणि त्यांना प्रताडित करण्याचे अनेक डाव महाविकास आघाडीकडून मांडले गेले होते. हिंदूंच्या घरापर्यंत जाऊन दंगली घडवणे, मालाड मालवणी भागात रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीवर झालेली दगडफेक, अनधिकृत मदरसे बांधणे, हिंदू वस्तीत जाऊन मांसाहाराची विक्री करणे आणि झुंडशाहीचा वापर करून दहशत निर्माण करणे असे प्रकार काही घटकांकडून राजरोसपणे केले जात आहेत. हिंदू दरवेळी सहिष्णुतेची भावना जोपासून या गोष्टी सहन करतो, याचा अर्थ हिंदू काहीही करू शकत नाही असे नाही. एका मर्यादेपर्यंत आम्ही हे सगळे प्रकार सहन करू, मात्र जर हिंदूंच्या भावना अनावर झाल्या, तर आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी खंबीर आहोत हे त्या वर्गाने लक्षात ठेवावे. संबंधित वर्गाकडून केल्या जाणार्‍या अनधिकृत आणि बेकायदेशीर कामांना प्रशासनातील काही घटकांचा पूर्ण पाठिंबा असून त्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार निर्धास्तपणे सुरु आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आमची विनंती आहे आणि आमची अपेक्षा आहे की, राज्य सरकार या असामाजिक घटकांपासून हिंदूंचे रक्षण करेल आणि सर्वांना समान न्यायाची भावना पुन्हा एकदा गडदपणे अधोरेखित होईल.

‘महापुरुषांचा अपमान कराल तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर मिळेल’

”काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करण्याआधी आपली लायकी तपासावी. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकर ज्या कोठडीत राहिले तिथे राहुल गांधींनी काही तास घालवून दाखवावेत असे माझे त्यांना आव्हान आहे. उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतल्यानंतरही काँग्रेस नेत्यांकडून सावरकरांवर टीका केली जात आहे आणि यातून काँग्रेसच्या लेखी उद्धव ठाकरेंची किंमत किती हे स्पष्ट होते. काँग्रेस असो किंवा कुणीही जर तुम्ही आमच्या महापुरुषांचा अपमान करत असेल तर तुम्हाला त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल,” असा थेट इशारा आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121