मुंबई : दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा देशभर गाजत असताना, महाराष्ट्रातही ठाकरे सरकारच्या काळातील मद्य धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मद्य धोरणाच्या चौकशीची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गोत्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दोनच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यातही मद्य धोरण घोटाळा झाला असल्याचे म्हटले जात असून, भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०२२ मध्ये आणलेल्या मद्य धोरणात घोटाळ्याचा आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करून या मद्य धोरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ज्या पद्धतीने दिल्लीत मनीष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केली तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.विदेशी दारुवरील कर माफ बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी दिल्लीत सुरू असलेल्या ‘सीबीआय’ चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत? महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? म्हणूनच अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले? दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेर्यात?असे ट्विट करत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यातून शेलार यांनी या मद्य धोरणाच्या चौकशीचेच संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास उद्धव ठाकरे आणखीनच गोत्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
ठाकरेंच्या धोरणामुळे महाराष्ट्राचे झाले असते मद्यराष्ट्र
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत दि. २७ जानेवारी, २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नव्या मद्य धोरणाविषयी एक निर्णय घेतला होता. त्यानुसार सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या विरोधात असलेल्या भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, अशा शब्दांत याला विरोध दर्शवला होता. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. याशिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही याविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता.
मद्यधोरण विक्रेत्यांना पूरक
देशातील मद्य उद्योगात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. मद्यातून राज्याला मिळणार्या एकूण महसूलापैकी ६५ टक्के महसूल नाशिक, पुणे आणि सांगली विभागातून मिळतो. महाराष्ट्रात दररोज ८० ते ९० लाख लीटर मद्यविक्री होते. नव्या मद्यधोरणासंदर्भातील निर्णय घेण्यापूर्वी दि. १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी तत्कालीन ठाकरे सरकारने अधिसूचना जारी करत आयात होणार्या मद्यावरील उत्पादन शुल्क ३०० टक्क्यांवरून घटवून १५० टक्के केले होते. यामुळे आयात होणार्या मद्याची किंमत ३० ते ५० टक्के कमी झाली होती. महाराष्ट्रात २० वर्षांनंतर मद्य धोरणात बदल करण्यात आला होता.