मुंबई : कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले आहेत. भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे पोलिसांच्या उपस्थितीत कसब्यातील मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत भाजपकडून पोलिसांच्या मदतीने पैसे वाटले जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच, याविरोधात ते उपोषणालाही बसले आहेत. धंगेकरांच्या या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर देताना सांगितले, "पोटनिवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे. अशावेळली प्रचार करता येत नाही. त्यामुळेच असे स्टंट करुन प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मविआच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांचे हे उपोषण भाजपविरुद्ध नाही, तर मतदारांविरुद्ध आहे. पैसे वाटण्याची संस्कृती आमची कधीही नव्हती." असे फडणवीस म्हणाले.