असं म्हणत. पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा लोककलेतून सादर करणारा वासुदेव आपण पाहिलाच असेल. लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मंत्र जपत शतकांपुर्वी महाराष्ट्रात लोककलांची निर्मिती झाली. पण याचं महाराष्ट्रातील काही लोककलांचे अयोध्येशी राममंदिरांशी आणि रामकथेशी संबध आहेत. आजही गावखेड्यात दोन माणसं एकमेकांना भेटल्यावर 'राम राम' म्हणून अभिवादन करतात. त्यामुळे रामकथा ही मराठी जनमानसात आणि भावजीवनात खोलवर रुजलेली आहे. ज्याची पाळमुळं आजही लोककलांच्या माध्यामातून आपल्या समोर येतात. महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव मानल्या जाणाऱ्या शाहिरी काव्यातही रामकथेचे अनेक उल्लेख आलेले आहेत. मराठी लोकगीतांमध्ये विशेषत:स्त्रीगीतांमध्ये रामजन्म, सीता स्वयंवर, सीता वनवस वगैरे घटनांवर असंख्य गीते आहेत. मराठी लोकगीतांच्या थोर अभ्यासिका सरोजिनी बाबर यांनी 'जनलोकांचा सामवेद' ह्या पुस्तकात अशी अनेक गीते संग्रहीत केली आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध आदिवासी समुदायांच्या लोककथा आणि लोकगीतांमध्ये राम, सीता, लक्ष्मण, मारुती यांची उदाहरणे हमखास मिळतात.
भक्ती, प्रबोधन, रंजन अशा तीन पातळ्यांवर लोककलेने जनमानसांवर प्रभाव टाकला आहे. महाराष्ट्रातल्या किमान तीन वैशिष्ट्यपूर्ण लोककलांना रामायणाने जन्म दिला आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे ह्या तिन्ही लोककला अयोध्येपासून तरी लांब, अक्षरशः दुसऱ्या टोकाला असलेल्या भागात जन्माला आल्या अहेत. ह्या लोककला म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोकणात सादर केल्या जाणाऱ्या खेळे , चित्रकथी आणि दशावतार.दशावतार व चित्रकथी हे दोन्ही कलाप्रकार दक्षिण कोकणातले असून 'खेळे' हा प्रामुख्याने उत्तर कोकणातला प्रकार आहे. दशावतार ह्या नाट्यप्रकारात रामायणातल्या विविध कथा रंजक पद्धतीने सादर केल्या जातात. कोकणातील प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली दशावतार ही एक लोककला आहे. विष्णूने दहा अवतार धारण केले होते. त्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी आणि बुद्ध यांचा समावेश आहे. यातील पहिली चार प्राणीरूपे आहेत. कलंकी आणि बुद्ध हे दोन अवतार दशावतारात दाखवण्यात येत नाहीत. ही सर्वच पात्रे रंगमंचावर येत नसतात. दशावताराच्या पूर्वरंगात गणपती, सरस्वती, भटजी, शंकासूर आणि विष्णू ही पात्रे दाखवली जातात. त्यानंतर आख्यान सुरू होते. आख्यान हे पौराणिक विषयावर असते. दशावतारातील संवाद लिखित स्वरुपात नसतात.
त्यानंतर रामकथेतून जन्म झालेला दुसरा लोककला प्रकार म्हणजे, चित्रकथी. चित्रकथी हा आजच्या परिभाषेतील multimedia प्रकार आहे. त्यात चित्रांच्या पट्ट्या हे मुख्य साधन, पण वाद्यसंगीत, समूहगान, सूत्रधाराचे कथन या सगळ्यांची जोड देऊन रामायणातल्या विविध कथा त्यात सांगितल्या जातात. उत्तर कोकणातील 'खेळे' किंवा 'नमन' हा दशावतारासारखाच लोकनाट्याचा प्रकारदेखील रामायणाच्या कथा सांगत सांगतच विकसित झाला होता. आता बदलत्या काळानुसार अनेक नवी व वेगळी कथानके या कलांचे सादरकर्ते वापरत असले तरी त्यांचा मूळ आधार रामायण हाच होता.
त्यानंतर खेळे हा लोककला प्रकार चंदगडमध्येच पाहायला मिळतो. खेळे या सामूहिक लोककला प्रकारात तीन संगीत साथीदारांबरोबर किमान दहा साथीदार असतात. संगीत साथ देताना डफ, कासाळ व नळी या संगीत साधनांचा वापर केला जातो. मुळात कोकणातील ह्या कलांचा जन्म नेमका कधी झाला हे सांगणे अवघड आहे. पण 'दशावतार' हा नाट्यप्रकार संत तुलसीदासांनी निर्माण केलेल्या रामलीलेच्या समकालीन असावा असे आनुषंगिक पुराव्यांवरून दिसते. कारण समर्थ रामदासांनी दासबोधात म्हटले आहे की, 'नेटके खेळता दशावतारी । तेथ येती सुंदर नारी। नेत्र मोडिती कळाकुसरी। परि अवघे ते धटिंगण ।।. त्यामुळे दासबोधात सुद्धा दशावतार या लोककलेचा उल्लेख आढळतो. त्यामुळे खेळे किंवा नमन, दशावतार ह्या लोकनाट्य प्रकारांमध्ये स्त्रीभूमिका पुरुषच करतात.
त्या पद्धतीचा संदर्भ देऊन रामदासांनी हे लिहिले आहे. समर्थांच्या काळात दशावतारी नाट्यकला दृशंत देण्यासाठी वापरण्याइतकी प्रस्थापित झालेली होती असा त्याचा अर्थ होतो. तुलसीदास समर्थाच्या पूर्वी सुमारे ८०/९० वर्षे अगोदर होऊन गेले होते. रामलीला हा लोकनाट्यप्रकार तुलसीदासांनी निर्माण केला. त्याच सुमाराला जर त्यांच्या अयोध्येपासून हजारो मैल दूर असलेल्या कोकण किनारपट्टीवर दशावतार व 'खेळे' हे समांतर लोकनाट्य प्रकार जन्माला आले असतील तर ह्या विलक्षण योगायोगामागील कारणे शोधली पाहिजेत.