मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मविआकडून मोर्चेबांधणीस सुरूवात झाली आहे. महायुतीला शह देण्याकरिता मविआ आघाडी उभी राहत असतानाच आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी घटक पक्षालाच घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या जीवावर एकही जागा जिंकत नाही त्यांना काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल असे विधान संजय निरुपम यांनी केले.
दरम्यान, संजय निरुपम यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, आम्ही याबाबत दिल्लीत हायकंमाडशी बोलू तसेच, जागावाटपासंदर्भातील निर्णय दिल्लीत होणार आहे. कोण संजय निरुपम म्हणत राऊतांनी त्यांच्या वकतव्याला केराची टोपली दाखवली. शिवसेना उबाठा गट लोकसभेसाठी २३ जागांची मागणी करत आहे. यावरून उबाठा गट आणि काँग्रेस या दोघांत खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे.
एकंदरीत, इंडिया आघाडीचा जागावाटपाचा प्रश्न अद्याप तरी सुटला नसून काँग्रेस पक्षाला अन्य मित्रपक्षांना सामावून घेताना जागावाटपाचा तिढा सोडवताना मोठी कसरत करावी लागेल, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. त्याचबरोबर, जागावाटप हे मेरिटच्या आधारावर व्हावे, असे मत नाना पटोलेंनी व्यक्त करत या प्रकरणात उडी घेतली. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.