नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवसाकडे भारताच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याचा दिन म्हणून आपण पाहतो, असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी खासगी हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचा दिवस २२ जानेवारी २०२४ अर्थात पौष शुक्ल द्वादशीचा दिन हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याचे आपण मानतो. मात्र, २२ जानेवारी २०२४ रोजी भारताच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याचा दिन ठरणार आहे. भारत हा त्याग करणाऱ्यांचा देश आहे. देव, देश आणि धर्मासाठी महाराणा प्रताप असो गुरू गोविंदसिंग असो यांनी त्याग केला आहे. श्रीरामजन्मभूमीसाठीदेखील ५०० वर्षांचा लढा दिला असून अनेकांनी त्याग केला आहे. त्यासाठीचा केवळ १९८४ सालापासूनचा त्याग आठवतो, मात्र त्यापूर्वीही झालेल्या त्यागाचे स्मरण करणे हे कर्तव्य असल्याचे चंपतराय म्हणाले.
श्रीराममंदिराच्या उभारणीत १३५ कोटी लोकांनी आपले योगदान दिले असल्याचे चंपतराय यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, श्रीरामजन्मभूमी आंदोलनात १५ हजार संतांनी आपापल्या भागात जनजागृतीचे काम केले आहे. त्यांनादेखील प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावण्यात येणार असून १३ आखाड्यांशिवाय प्रत्येक परंपरेतील किमान १२५ संत-मुनी येणार आहेत. भारतातील प्रत्येक जिल्ह्यातून एक संत असेल. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व व्हावे, असा आमचा विचार आहे. क्रीडा, शास्त्रज्ञ, साहित्य, संरक्षण, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, हुतात्मा सैनिकांचे कुटुंबीय, निवृत्त न्यायाधीश आणि वकील यांच्यासोबतच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह कारसेवेतील हुतात्म्यांच्या कुटुंबियांनाही प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण देण्यात येत असल्याचेही चंपतराय यांनी नमूद केले आहे.
असे असतील श्रीरामलला
श्रीरामललाची प्रतिमा पाच वर्षांच्या बालकाची असणार आहे. पाच वर्षांच्या श्रीरामललाचे भाव, डोळे, भालप्रदेश याचा सखोल अभ्यास करण्याक आला आहे. प्रतिमेची उंची ५१ इंच असणार आहे. त्यासाठी तीन प्रतिमांची निर्मिती करण्यात आली असून पुढील १५ दिवसात प्रतिमेची निश्चिती करण्यात येणार असल्याचीही माहिती चंपतराय यांनी दिली आहे.