पंतप्रधान आणि सरसंघचालकांच्या उपस्थितीत श्रीरामलल्ला होणार विराजमान!

संघ स्वयंसेवकांचे देशभरात "व्यापक संपर्क अभियान"!

    07-Nov-2023
Total Views | 107

ramlalla

मुंबई :
"अयोध्येत श्रीराममंदिर निर्माणाचे कार्य जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असून यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संघ स्वयंसेवकांकडून देशभरात व्यापक संपर्क अभियान राबविले जाणार आहे.", अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी दिली.

रा.स्व.संघाची तीन दिवसीय (५,६,७ नोव्हेंबर) अखिल भारतीय कार्यकारी मंडल बैठक गुजरातच्या श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुल, भूज येथे नुकतीच पार पडली. दरम्यान बैठकीच्या शेवटच्या दिवशी बैठकीतील विषयांचा आढावा देण्याकरीता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.

तीन वर्षांपूर्वी (दि. ५ ऑगस्ट २०२०) अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे देखील उपस्थित होते. प्रखर राष्ट्रवादी विचाराने चालणाऱ्या आणि राष्ट्रप्रथम या भावनेने कार्य करणाऱ्या या दोन व्यक्तिमत्वांना पुन्हा एकदा श्रीरामलल्लाच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे.

अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याविषयी बोलताना सरकार्यवाह म्हणाले, "या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान संघाचेही विशेष योगदान असेल. दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत संघ स्वयंसेवकांकडून देशभरात 'व्यापक संपर्क अभियान' राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून श्रीराम मंदिर व रामलल्लाची प्रतिमा घरोघरी कशी पोहोचवता येईल, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन कसे करता येईल, त्यामध्ये समाजाला संघटित करून कसे जोडता येईल यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली."

संघ शिक्षा वर्गाबाबत बोलताना ते म्हणाले की, "संघाचे प्राथमिक, प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघ शिक्षा वर्ग नियमितपणे सुरु असतात. यात वेगवेगळ्या वयोगटाचे शिक्षार्थी सहभागी होतात. त्यामुळे शिक्षार्थ्यांच्या वयानुसार त्यांच्या संघ शिक्षा वर्गाची आखणी यापुढे करण्यात येईल. त्याचबरोबर केवळ वर्गस्थानी अभ्यासक्रम न घेता समाजात जाऊन त्यांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगवरही विशेष भर देण्यात येईल."

पुढे ते म्हणाले, "मणिपूरमधील सद्यस्थिती आणि मतदानासाठी नागरिकांना केलेले आवाहन या व्यतिरिक्त बैठकीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. निवडणुकीच्या काळात जातीला धरून विधाने केली जातात. त्यामुळे समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. समाज संघटीत राहण्यासाठी नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्याचे काम स्वयंसेवक सध्या करत आहेत. एकंदरीतच संघाकडून समाजाला सामाजिकदृष्ट्या विचार करून योग्य व्यक्तीस मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे."

संघाच्या आयामांमध्ये सीमासुरक्षा हा एक भाग आहे. त्यासंदर्भातही संघकार्याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. देशाच्या सीमेलगत असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील मुलांचे शिक्षण, तेथील सीमासुरक्षा, या क्षेत्रांत राष्ट्रविचारांनी चालणारे नागरिक तयार करणे असे कार्य संघ स्वयंसेवकांकडून होत असते. त्यामुळे सीमावर्ती क्षेत्राचा विकास कसा होईल, तेथील नागरिक स्थलांतरीत होऊ नयेत यासाठी काय करता येईल; यासंदर्भात बैठकीमध्ये विशेष चर्चा झाली.

एकंदरीतच सरसंघचालकांच्या उपस्थितीत या तीन दिवसीय बैठकीत सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणाचे रक्षण, स्वदेशी जीवनशैली, नागरिक कर्तव्य या समाजपरिवर्तनाच्या पाच आयामांवर चर्चा झाली. आपल्या शाखा परिसरातून हे विषय समाजात कसे पोहोचवता येतील यावर विचारविनिमय करण्यात आला. विजयादशमी उत्सवातील सरसंघचालकांच्या उद्बोधनातील मुद्द्यांवर समाजातील काही लोकांना संघटीत करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.

बैठकीला सर्व सहसरकार्यवाह व इतर कार्यविभाग प्रमुख उपस्थित होते. दरम्यान एकूण ४५ प्रांतांचे प्रांत संघचालक, प्रांत सहसंघचालक, प्रांत कार्यवाह, प्रांत सहकार्यवाह, प्रांत प्रचारक आणि सह प्रांत प्रचारक यांचीदेखील उपस्थिती होती. याशिवाय विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ यासह विविध समविचारी संघटनांचे निवडक संघटन मंत्री असे देशभरातून एकूण ३५७ कार्यकर्ता बैठकीत सहभागी झाले आहेत. बैठकीचा समारोप ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.

किशोर वयीन मुलींमध्ये लव्ह-जिहाद संदर्भात जनजागृती
"संघविचाराने चालणाऱ्या विविध संघटनांमध्ये महिलांचा विशेष सहभाग आहे. महिला सशक्तीकरण तसेच सरकारच्या योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या महिलांकडून होत आहे. यात राष्ट्र सेविका समिति विशेष कार्यशील आहे. लव्ह-जिहादसारख्या मुद्द्याला धरून किशोर वयीन मुलींमध्ये त्यासंदर्भात जनजागृती करण्याचे काम त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात होत आहे. त्याचबरोबर लव्ह-जिहादला बळी पडलेल्या पिडितेच्या पुनर्वसनाविषयीची योजनाही सध्या सुरु आहे."

भेदभाव विसरून राष्ट्रप्रथम विचाराने चालणे गरजेचे
"भारतात अशा काही आसुरी शक्ती आहेत ज्या दक्षिण भारताला उत्तर भारतापासून वेगळं करण्याचा त्यांचा विचार आहे. समाजात लोकांच्या मनात भेदभावाची भावना निर्माण करून हे कृत्य करण्याच्या ते तयारीत आहेत. त्यामुळे समाजातील काही जागृत मंडळींनी याबाबत विचार करून समाज परिवर्तनासाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रप्रथम या विचाराने सर्वांनी चालणे गरजेचे आहे. असा समाज घडवण्याचे काम सध्या संघ स्वयंसेवक करत आहेत."

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121