नवी दिल्ली : देशाला घुसखोरांपासून वाचविण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू होणार असून त्यापासून रोखण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी कोलकाता येथे प्रतिवाद सभेत केले आहे.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टिका केली. ते म्हणाले, पश्चिम बंगाल राज्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून त्याविरोधात राज्य सरकार कारवाई करण्यास अपयश ठरले आहे. घुसखोरी असलेल्या राज्याचा चौफेर विकास होणे शक्य नाही. त्यामुळेच विकासविरोधी असलेल्या ममता बॅनर्जी सीएए लागू करण्यास विरोध करत आहेत. मात्र, सीएए हा देशाच्या संसदेने मंजुर केलेला कायदा आहे. त्यामुळे हा कायदा लागू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे शाह यांनी म्हटले.
डाव्या पक्षांसह ममता बॅनर्जी यांनी प. बंगालला उध्वस्त केल्याचा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते पुढे म्हणाले, बंगालमध्ये 27 वर्षे कम्युनिस्टांनी राज्य केले आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले. दोघांनी मिळून बंगालचा नाश केला. संपूर्ण देशात निवडणुकीतील हिंसाचाराचे प्रमाण बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकलेल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात असून ममता बॅनर्जी गप्प बसल्या आहेत. त्यामुळे बंगालला पुन्हा सोन्याचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्याची गरज असल्याचेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले आहे.
२०२६ साली भाजपला मिळणार दोन तृतीयांश बहुमत
भाजप २०२६ सालच्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. बंगालच्या जनतेने २०१९ साली भाजपला लोकसभेच्या १८ जागांवर विजय मिळवून दिला होता. ‘मी बंगालमुळे पंतप्रधान झालो’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगावे लागेल, एवढे भव्य यश २०२४ साली बंगालच्या जनतेने भाजपला द्यावे, असेही आवाहन शाह यांनी केले आहे.