मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुविधेसाठी उपनगर जिल्ह्यात विविध सोयीसुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षरित्या जाणून घेण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री कक्षाची स्थापना केली आहे. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून शिक्षण, आरोग्य, उन्नतीकरण व सुशोभीकरण, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, जल पुरवठा इत्यादी सुविधा सुधारण्यासाठी आमूलाग्र बदल घडवण्यात आले आहेत. पालकमंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या नवीन योजना, प्रलंबित कामे आणि भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या नव्या संकल्पना याबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांची महापालिका मुख्यालयात भेट घेणार आहेत.
शिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, आरोग्य विभागांतर्गत आपला दवाखाना, पाळणाघर, रुग्णालय मदत कक्ष, स्मशान भूमी, सार्वजनिक शौचालय, उद्यान विभागाअंतर्गत उद्यान, मनोरंजन मैदाने क्रीडांगणे सुशोभीकरण, घन कचरा व्यवस्थापन व कचरा वर्गीकरण, डब्बे पुरवठा, मलबार हिल येथील जलाशयाची क्षमता वाढवण्याच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा, पी / उत्तर विभाग कार्यालयाचे पी/ पूर्व उपविभाग कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी २ महिन्याची विशेष मोहीम राबवणे इत्यादी विषयांवर पालकमंत्री लोढा या भेटीदरम्यान आयुक्तांशी चर्चा करतील.
पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत लोढा यांनी लहान मुलांसाठी किलबिलाट रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका, शिक्षण क्षेत्रात कौशल्य प्रधान प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमांची सुरुवात, आपला दवाखाना योजनेचे सक्षमीकरण, रुग्णमित्र मदत कक्षाची स्थापना, मुंबई उपनगरात हजारो शौचालये उभारण्याचा प्रकल्प, अतिक्रमणे हटवून देशी खेळांसाठी मैदाने उपलब्ध करून देणे, मलबार हिल येथील जलाशयाचा निर्णय तसेच ओपन स्पेस पॉलिसीच्या बाबतीतील निर्णय, याबाबत पालकमंत्री लोढा यांनी नेहमीच प्रत्येक निर्णयात जनसहभाग वाढण्याचा प्रयत्न केला आहे.
मलबार हिल येथील पाण्याच्या टाकीची क्षमता वाढवण्यासाठी पालिकेच्या प्रस्तावाला तेथील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्या संदर्भात काही पर्यायी व्यवस्था करता येईल का? यावर ही चर्चा होणार आहे. पी/ उत्तर विभाग कार्यालयाचे पी/ पूर्व उपविभाग कार्यालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी पालकमंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेतील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत घेतली होती. त्याचा चांगला परिणाम झाला. पेन्शन अदालत नंतर अवघ्या तीन दिवसात ६७ कर्मचाऱ्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झाली होती. तरी ही अजून ही बऱ्याच कर्मचाऱ्यांची पेन्शन बाकी आहे. त्यासंदर्भात १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पेन्शन संदर्भात विशेष मोहीम महापालिका मुख्यालयात राबविण्याबाबत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यापूर्वीच सूचना केली आहे.