मुंबई : जर एखादी मालगाडी सामान्य रुळावर धावत असेल तर एक्सप्रेस ट्रेनला थांबवले जाते. परंतु इथून पुढे एक्सप्रेस न थांबता सुसाट धावणार आहे. कारण, भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विद्युतीकरण आणि बळकटीकरणासोबतच मालवाहतूकीसाठी एक कॉरिडॉर बांधला जात आहे. देशाचा ७४ टक्के महसूल मालवाहतुकीतून येतो, पण वाहतूक व्यवसायात रेल्वेचा वाटा अजूनही २७ टक्के आहे. राष्ट्रीय रेल्वे योजनेअंतर्गत हा हिस्सा ४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
जेएनपीटी (मुंबई) ते दादरी (उत्तर प्रदेश) या १५०६ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा मुख्य भाग वैतरणा ने जेएनपीटीपर्यंत बांधला जात आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर २०२३ मध्ये दादरी ते वैतरणा पर्यंतचा वेस्टर्न डीएफसी कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. दादरी आणि जेएनपीटी दरम्यानचा हा १५०६ किमी लांबीचा कॉरिडॉर पूर्ण होण्यासाठी १५ वर्षे लागली. तसेच दादरीपासून वैतरणापर्यंत अनेक भागात ट्रॅक टाकण्यात आले आहेत.
सामान्य ट्रॅकवर माल गाड्यांसाठी कंटेनर फक्त ४.२६ मीटर पर्यंत उंच असतो. तर डीएफसीमध्ये, डबल स्टॅक कंटेनर ७.१मीटर उंच असेल. मालगाड्यांसाठी सामान्य ट्रॅकवर कंटेनरची रुंदी ३.२ मीटर आहे, तर डीएफसी मध्ये ती ३.६६ मीटर असेल. सामान्य ट्रॅकवर मालगाडीची लांबी ७०० मीटरपर्यंत असते, तर डीएफसीमध्ये १५०० मीटरपर्यंत दुप्पट होणार. सामान्य मार्गावरील मालगाडी जास्तीत जास्त ५४०० टन मालवाहतूक करू शकते, तर डीएफसीवर धावणाऱ्या ट्रेनची मालवाहतूक क्षमता १३,००० टन असेल.
मुंबई आणि उपनगरातील रेल्वेची इतर कामे
गेल्या वर्षी भिवंडीजवळच्या उल्हास नदीवर ८० मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला होता. तसेच कळंबोलीजवळ ११० मीटर लांबीचा रेल्वे पूल बांधला जात आहे. यासोबतच विरारजवळ दोन मोठे बोगदे बांधण्यात आले असून एकाची लांबी ४३० मीटर आहे. तर दुसऱ्या बोगद्याची लांबी ३२० मीटर आहे. गेल्या आठवड्यात कोपर ते ठाकुर्ली दरम्यानच्या दुसऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी ८० मीटर लांबीचा गर्डर टाकण्यात आला आहे.