उद्योग पळवले म्हणवणाऱ्यांना जे.पी.नड्डांनी सुनावले

    03-Jan-2023
Total Views |

राज्यात ३ लाख ७५ हजार कोटींची एफडीआय गुंतवणूक!
उद्योग पळवले म्हणवणाऱ्यांना जे.पी.नड्डांनी सुनावले
चंद्रपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांनी चंद्रपुरात भाजपचा मेळावा घेऊन संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले. जे.पी. नड्डा म्हणाले की, "महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात 3.75 लाख कोटी रुपयांची एफडीआय आली आहे. जग कोरोनाच्या संकटातून जात आहे, प्रत्येक देश या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत." असं जे. पी. नड्डा म्हणाले.
 
 
पुढे ते म्हणाले, "मंदीच्या दिवसातही भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या नंबरवर गेला आहे. या मंदीच्या दिवसातही भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आज अमेरिका आणि रशिया संकटातून जात आहेत. पण, भारत अर्थव्यवस्था स्थीर करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आपण स्टीलमध्ये जगात दोन नंबरला आहे. या सर्व गोष्टी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात करत आहोत." असं ही ते म्हणाले.
 
 
नड्डा यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "मविआ ने भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली आहेत. उद्धव, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आमच्यासाठी JAM चा अर्थ जन धनासाठी 'J', आधारसाठी 'A' आणि मोबाईलसाठी 'M' आहे. तर मविआ सरकारसाठी, JAM म्हणजे संयुक्तपणे पैसे मिळवणे. पालघरमध्ये साधूंना कशी वागणूक दिली जाते हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. हिंदुहृदयसम्राट यांच्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दबावाखाली सीबीआयकडे तपास सोपवला नाही. असे सरकार राज्यात आले ज्याच्या प्रमुखाने आपल्या विचारसरणीशी तडजोड केली."
 
 
"विकासाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे नरेंद्र मोदी. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आणि ज्यांच्या विरोधात बाळासाहेब नेहमीच लढले त्यांच्या पाठीशी उभे राहिले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने मिळून 48 जागा लढवल्या होत्या, ज्यामध्ये भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या."
 
 
जेपी नड्डा पुढे म्हणाले की, "आम्ही डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण सुरू केले, त्यांनी डीबीटी देखील सुरू केला ज्याचा अर्थ डीलरशिप, ब्रोकरेज आणि हस्तांतरण होते. राजकारणात कोण हितचिंतक आहे आणि मगरीचे अश्रू ढाळून कोण तुमच्या हक्काचे शोषण करत आहे, हे जनतेने समजून घेतले पाहिजे." असा थेट इशारा त्यांनी दिला.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.