'कॅमेरा ट्रॅप'द्वारे वन्यजीव संरक्षण

    16-Jan-2023
Total Views |
leopard
 
 
चिपको आंदोलनापासून पुराव्यावर आधारित संवर्धनापर्यंत वन्यजीव संवर्धनाने खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि यामध्ये कॅमेरा ट्रॅपच्या शोधाने मोठी भूमिका बजावली आहे. कॅमेरा ट्रॅप्स म्हणजे काय आणि ते सध्याचे वन्यजीव वाचवण्यासाठी कसे वापरले जातात ते जाणून घेऊ या.



वन्यजीव संरक्षण हे आजकाल आपण प्रत्येकाच्या तोंडून ऐकत आहोत. वन्यजीव संरक्षण म्हणजे नेमके काय? आपण ते कसे करू शकतो? ते खरोखर आवश्यक आहे का? पूर्वी, म्हणजेच एकोणिसाव्या शतकापर्यंत आपल्याकडे भरपूर नैसर्गिक संसाधने होती. त्यानंतर उद्योगांचे युग आले, मानवी लोकसंख्या अक्षरशः दुप्पट झाली. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांवर ताण येऊ लागला. परिणामी, यामुळे प्राण्यांचा संख्येत वेगवेगळ्या गतीने घट झाली. हि बाब कदाचित गंभीर वाटणार नाही, परंतु प्रत्येक जीव पर्यावरणीय जाळ्यांद्वारे एकमेकांशी जोडलेला आहे, त्यामुळे धोक्यात आलेल्या प्रजातींना वाचवणे हे सर्वोपरि आहे. मग या धोक्यात आलेल्या प्रजातींना आपण कसे वाचवायचे? सर्व जंगले आणि वन्य क्षेत्रांना कुंपण घालायचे? कि आपण वन्यजीवांना पूर्णपणे दुरावते करायचे? की चिपको आंदोलनाच्या काळात परत जायचे?


या शतकाची व्याख्या तंत्रज्ञानाने केली असून आपण तंत्रज्ञानाचा वापर करून संवर्धनाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. त्याला पुराव्यावर आधारित संवर्धन म्हणतात ज्याला इंग्रजीत एव्हिडन्स बेस्ड कन्झर्वेशन असे म्हंटले जाते. कुठल्याही समस्येचा मुळाशी जाऊन, त्याला समजून घेऊन त्याच्यावर तोडगा काढणे ह्याला पुराव्यावर आधारित संवर्धन म्हंटले जाऊ शकते. ह्यासाठी गरज आहे वैज्ञानिक (सायंटिफिक) डेटा ची जो पुराव्याचे काम करते. एव्हिडन्स बेस्ड कन्झर्वेशन सुरु झाल्यावर, बरेच तंत्रज्ञान विकसित झाले आणि शोध देखील लागले. त्यापैकी एक खूप मोठा शोध हा कॅमेरा ट्रॅप चा.
 
 
 
जंगली अधिवासाचे निरीक्षण करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ते विशेषतः एखाद्या विशिष्ट प्रदेशातील सस्तन प्राण्यांच्या क्रियाकलाप आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जातात. कॅमेरा ट्रॅप सर्वत्र प्राण्यांचा पाठलाग करत नाही, परंतु ते संशोधकांना त्या प्राण्याच्या जीवनाचा स्नॅपशॉट देतात. एका छायाचित्रांमधून आपण प्राण्याच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी समजून घेऊ शकतो. पण कॅमेरा ट्रॅप म्हणजे नक्की काय? एखादा सामान्य कॅमेरा वापरायला त्याला सक्रियपणे म्हणजेच ऍक्टिव्हली हाताळावा लागतो; त्याची सेटिंग बदलावी लागते, शटर बटण स्वहस्ते क्लिक करून त्यानंतरच एक छायाचित्र तयार होतं.
 
 
 
परंतु जेव्हा कॅमेरा ट्रॅप्स हि खूपच नवीन टेक्नोलोंजि होती, तेव्हा त्यालासुद्धा सक्रियपणेच हाताळायला लागायचे, आताच्या काळातले कॅमेरा ट्रॅप्स खूपच पुढे आले आहेत. सामान्यपणे कॅमेरा ट्रॅपमध्ये ४ मुख्य गोष्टी आहेत: नियंत्रण पॅनेल, फ्लॅश, मोशन सेन्सर आणि कॅमेरा. कॅमेरा ट्रॅप सुरु केल्यावर त्यामधली सेन्सर सुरु होतं. त्या सेन्सर समोरून कोणतीही व्यक्ती, प्राणी किंवा कोणतीही हालचाल झाली तर त्याचा फोटो घेतला जातो. फ्लॅश चा वापर फक्त रात्री किंवा कमी प्रकाशातच फोटो काढण्यास केला जातो.


कॅमेरा ट्रॅप्स वापरण्याचा मुख्य हेतू म्हणजे प्राण्यांना अडथळा न आणता त्यांना शोधणे किंवा बघणे हा आहे. बर्‍याच वन्यजीव संशोधकांनी त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्सच्या वापरामध्ये विविधता आणली आहे. सस्तन प्राण्यांच्या विविधतेचे निरीक्षण करण्यापासून, लोकसंख्येची रचना समजून घेणे ते शिकार-शिकारी परस्परसंवाद पाहण्यापर्यंत, कॅमेरा ट्रॅप्स सर्व खंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत. संपूर्ण भारतातील वाघांची संख्या आणि तिची घनता यावर लक्ष ठेवण्यासाठी ते भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कॅमेरा ट्रॅपची जोडी एखाद्या पायवाटेवर बांधली जाते ज्यावरून वाघ चालतात. प्रत्येक कॅमेरा ट्रॅप जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर बांधला जातो. वाघ जेव्हा त्या पायवाटेवरून चालतो तेव्हा दोन्ही कॅमेरे दोन्ही बाजूंनी त्याचे छायाचित्र टिपतात. प्रत्येक वाघाच्या शरीरावर पट्ट्यांचा एक विशिष्ट संच असतो.
 
 
एकदा दोन्ही बाजूंचे छायाचित्र-दस्तऐवजीकरण झाल्यानंतर, त्यास एक क्रमांक दिला जातो आणि अशा प्रकारे दस्तऐवजीकरण केलेल्या वाघांच्या यादीमध्ये जोडला जातो. वाघांचे शास्त्रोक्त दस्तऐवजीकरण करण्याची ही सध्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहराच्या मध्यवर्ती असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठी कॅमेरा ट्रॅपचा वापर करण्यात आला आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत, बिबट्यांच्या लोकसंख्येच्या अंदाजासंबंधीचे काम वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी, इंडियाचे निकित सुर्वे यांनी केले आहे.
 
 
संपूर्ण संरक्षित क्षेत्र आणि त्याचा परिघीय प्रदेश कॅमेरा ट्रॅप्सने जडलेला जातो. या क्रियाकलापादरम्यान, २०१९ मध्ये ४७ प्रौढ बिबट्यांची नोंद करण्यात आली. वाघांप्रमाणेच, बिबट्यांचा शरीरावर ठिपक्यांचा एक विशिष्ट संच असतो ज्यामुळे आपल्याला दोन बिबट्यांमध्ये फरक करता येतो. बिबट्यांबरोबरच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दस्तऐवजीकरण केलेले इतर सस्तन प्राणी म्हणजे मायावी रानमांजर, वाघाटी, सिव्हेटच्या दोन प्रजाती, सांबर, चितळ आणि बरेच काही.


कॅमेरा ट्रॅप्सच्या वापराने संशोधकांना त्यांच्या विविधतेसह इतरही अनेक गोष्टी सापडल्या. बिबट्यांच्या क्रियाकलापांचे नमुने उघड झाले ज्याने हे दाखवले की मानवी क्रियाकलाप कमीतकमी असताना ते शहरी जीवनाशी कसे जुळवून घेतात. कॅमेरा ट्रॅप्सने त्यांच्या आहारातील प्राधान्यांवरही प्रकाश टाकला. माणसांप्रमाणेच बिबट्यालाही 'आवडते' खाद्यपदार्थ असल्याचे आढळून आले. मांजरांची शिकार करण्यात माहिर असलेला एक बिबट्या आढळून आला होता! कारण त्या बिबट्याचे अनेक फोटो टिपले गेले ज्याच्यात त्याने तोंडात शिकार केलेली मांजर आढळून आली. बिबट्याला स्वतःच्या मावशीला मेजवानी देताना पाहून खूप आश्चर्य वाटले! जंगलात सापडलेल्या हरणांच्या मृतदेहांवर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. शिकार करण्यासाठी कोणता प्राणी जबाबदार आहे आणि इतर सर्व बिबट्या संधीसाधूपणे दुसऱ्याची शिकार करतात का हे समजून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

 
प्राण्यांचा पर्यावरणशास्त्रात (इकोलॉजि) वापरल्या जाणाऱ्या कॅमेरा ट्रॅप्सचा उपयोगामध्ये योग्य आणि ठोस उत्क्रांतीझालेली दिसून येते. या उत्क्रांतीमध्ये कॅमेरा ट्रॅप्सचा सामान्य वापर आणि परिणामी डेटा तसेच उपकरणे आणि सांख्यिकीय अनुमान (स्टॅटिस्टिकल मेथड) पद्धती यासारख्या अधिक विशिष्ट विषयांचा समावेश आहे. ही उत्क्रांती जितकी जलद आणि प्रभावशाली झाली आहे, तितक्याच वेगाने पुढच्या दशकातही ती सुरू राहण्याची अपेक्षा आहे. प्रामुख्याने पद्धतशीर विकासापासून ते गंभीर वैज्ञानिक आणि संवर्धन प्रश्नांच्या तपासापर्यंत कॅमेरा ट्रॅप अभ्यासावर भर देण्याच्या व्यापकतेची अपेक्षा आणि आशा आहे.

- ओंकार पाटील
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121