पुणे : "महाविकास आघाडी सरकारचे वाईन धोरण बरोबर होते, त्याने राज्यातील फळबाग शेतकऱ्यांना फायदाच झाला असता" असा साक्षात्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांना झाला आहे. पिंपरी-चिंचवड मधील द्राक्ष परिषदेत शरद पवार बोलत होते. महाविकास आघाडीचे वाईन धोरण अगदी बरोबरच होते पण काही कारणांमुळे तो निर्णय लागू झाला नाही, असेही पवार पुढे म्हणाले. राज्यातील बागायतदार शेतकरी अडचणीत असल्याने आपण हे म्हणत आहोत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे, प्रतिकूल हवामानामुळे कित्येक शेतकऱ्यांनी हा बागायतींचा व्यवसाय बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. देशातील द्राक्षांच्या उत्पादनातील फक्त ८ टक्के द्राक्षेच फक्त निर्यात होतात बाकी ९२ टक्के द्राक्षांची विक्री ही फक्त स्थानिक बाजार पेठांमध्येच होते, त्यामुळे जर स्थानिक बाजारपेठांवर लक्ष दिले आणि त्या मजबूत केल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असा दावा पवारांनी या परिषदेत केला आहे.
यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्रासाठी वाईन धोरण आणले होते. सर्व प्रकारच्या धान्यांपासून, फळांपासून वाईन निर्मितीला मान्यता दिली होती. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी, शेतीची उत्पादकता वाढवण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने त्यापासून वाईन निर्मितीचा उरफाटा घाट घातला होता. त्याचीच री शरद पवारांनी पुन्हा एकदा ओढली. त्यामुळे महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांच्या भल्यापेक्षा काहीतरी भलतेच मनसुबे होते हेच यातून उघड होते.