सातारा : राज्यातील पत्रकारांचे वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेले प्रश्न लवकरच सोडवले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मराठी पत्रकार परिषदेशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांसंबंधी कार्यवाही सुरु होईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठी पत्रकार परिषदेच्या सातारा जिल्हा शाखा प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची महाबळेश्वर येथे भेट घेऊन, यासंबंधीचे सविस्तर निवेदन दिले. राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच असून कित्येक सरकारे गेली तरी त्यावर तोडगा निघालेलाच नाही त्यामुळे लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी पत्रकार संघातर्फे करण्यात आली.
मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. याचवेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. या सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेतली जाईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. "पत्रकारांचे कार्य खूप मोठे आहे आणि राज्याच्या प्रश्नांवर त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळावे" अशी अपेक्षाही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.