मुंबई : पत्राचाळ प्रकरणातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिंतेत पडले असणार की आता आपला एकमेव मुलाखतकार तर गेला आता मुलाखत घेणार कोण ? अशी बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. राऊतांवर झालेल्या कारवाईने आता शरद पवार देखील चिंतेत पडले असणार की शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची धुणीभांडी कोण करणार अशी चिंता पवारांनाही पडली असणार अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.
अभिनेत्री कंगना रनोटने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती तेव्हा मुंबई महापालिकेकडून तिच्या घरावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. तिचे मुंबईतील घर तोडण्यात आले होते. त्याचवेळी तिने "आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा" असा इशारा दिला होता. कंगनाच्या याच इशाऱ्याची आठवण करून देत अतुल भातखळकरांनी "म्हणून महिलांचे तळतळाट घेऊ नयेत" असा सल्लाही राऊतांना दिला आहे.