ठाणे: पावसाने दाणादाण उडवल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन खड्डे पडले असतानाच ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नाहक ताप वाढला आहे. त्यामुळे, मंगळवारी प्रचंड वाहतूककोंडीझाल्याने ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांनाही या कोंडीचा त्रास सोसावा लागला. मुंबई-नाशिक महामार्ग, पूर्वद्रुतगती महामार्ग, घोडबंदर रोड आणि मुंब्रा बायपास मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिवसभर होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, कोंडी वाढल्याने वाहतूक शाखेने फतवे काढून अन्य मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन केल्याने संताप व्यक्त होत आहे.
गेले काही दिवस ठाणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने रस्त्यांवर खड्डे पडून वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना तातडीने ‘टास्क फोर्स’ची बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर, रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमएसआरडीसी’ यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करून खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, खड्डे भरणी मोहिमेवर पावसाने पाणी फिरवल्याने रस्त्यांची दुरुस्ती रखडली आहे. त्यातच अवजड वाहतूक सुरूच राहिल्याने कोंडीत भर पडल्याने ठाणेकरांच्या त्रासात आणखी वाढ झाली आहे.
कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठ भागात एक ट्रक बंद पडल्यामुळे या मार्गावर साकेत पूल ते वाघबीळ नाक्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे, घोडबंदर रोडवर ट्राफीक जाम झाले होते. घोडबंदर रोडवरील या कोंडीचा फटका ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीलाही बसल्याने नागरिकांची अभूतपूर्व कोंडी झाली होती.
दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी नव्याने एक संदेश नागरिकांसाठी प्रसारित केला. त्यामध्ये महापे-मुंबईमार्गे ठाणे गाठण्याचे आवाहन केल्याने ठाणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंब्रा बायपासवर भगदाड
मुंब्रा रेल्वे स्टेशन ते कौसा या मार्गावर होणारी प्रचंड वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुंब्रा बायपास हा मार्ग बांधा वापरा आणि हस्तांतरित करा (बिओटी) तत्वावर उभारण्यात आला. मुंब्रा बायपासमार्गे पनवेल, नवी मुंबई, न्हावाशेवा, जेएनपीटी बंदराकडे जाणारी बहुतांशी अवजड वाहने जातात. तीनच वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी केली होती. यंदा संततधार पडलेला पाऊस व वाहनांची वर्दळ यामुळे बायपास रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. मुंब्रा बायपास रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडडून लोखंडी सळई उघड्या दिसत असल्याचे ट्वीट मनसे आ. राजू पाटील यांनी करीत प्रशासनाने अवजड वाहतूक बंद करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.