मुंबई: मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. तसेच तातडीने पदभार स्वीकारावा असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मेट्रो ३ च्या प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून फडणवीस-शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबईच्या व्यस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत आपल्याकडे सोपविण्यात येत आहे. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा तिरिक्त कार्यभार श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास (भाप्रसे) यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्यादृष्टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्या निर्मितीत अश्विनी भिडे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अशातच अश्विनी भिडे या सुरुवातीपासून मेट्रो ३चे काम पाहत होत्या. त्यामुळे या प्रकल्पात येणाऱ्या अडथळ्यांचीही त्यांना कल्पना आहे. आरे कारशेडला झालेला प्रचंड विरोध, आंदोलन या सगळ्या घडामोडींदरम्यान भिडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. कथित पर्यावरणवादि आणि आरे विरोधकांचा विरोध दडपून काढण्यासाठीदेखील प्रयत्न केले होते. त्यामुळे मेट्रोचे काम पुन्हा गतीने होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा त्यांच्यावर मेट्रो प्रकल्पाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत. सनदी सेवेतील २४ वर्षांचा दांडगा अनुभव त्यांना आहे. अत्तापर्यंत महाराष्ट्रात विविध महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जानेवारी २०२०मध्ये त्यांची बदली करण्यात आली होती.