नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. १० जुलै रोजी नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. गुजरातमध्ये सुरत येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये हजारो शेतकरी आणि सुरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून यशस्वी झालेले इतर सर्व हितधारक सहभागी झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपालदेखील या परिसंवादात सहभागी झाले होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “आजचा कार्यक्रम म्हणजे कशा प्रकारे ‘अमृतकाळा’ची लक्ष्ये साध्य करण्याच्या देशाच्या संकल्पाचे गुजरात नेतृत्व करत आहे, त्याचे उदाहरण आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ७५ शेतकर्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सुरतचे यश संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यामध्ये सरपंचांची भूमिका अधोरेखित केली आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने शेतकर्यांना पुढे नेल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक पंचायतीमधून ७५ शेतकर्यांची निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण आणि इतर संसाधनांची मदत करत ठोस भूमिका बजावली. त्यामुळे ५५० पंचायतींमधील ४० हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीत गुंतले आहेत, असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. ही एक उत्तम सुरुवात असून अतिशय उत्साहवर्धक आहे. नैसर्गिक शेतीचे हे सुरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
“आमच्या गावखेड्यांनी दाखवून दिले आहे की, खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत तर बदलाचे नेतृत्वही करू शकतात. नैसर्गिक शेतीबाबतचे जनआंदोलन येत्या काळातही मोठे यश मिळवेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. जे शेतकरी या आंदोलनात लवकर सहभागी होतील त्यांना यांचा विशेष लाभ होईल,” असे ते म्हणाले.
“भारत हा निसर्ग आणि संस्कृतीने कृषी आधारित देश आहे. त्यामुळे आपला शेतकरी जसजसा प्रगत होईल, आपली शेती जसजशी प्रगती करत जाईल आणि समृद्ध होईल, तसतसा आपला देशही प्रगती करत जाईल. नैसर्गिक शेती हे समृद्धीचे तसेच आपल्या मातृभूमीचा आदर आणि सेवा करण्याचे साधन आहे,” यांचे त्यांनी शेतकर्यांना स्मरण करून दिले. “जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेती करता,तेव्हा तुम्ही पृथ्वी मातेची सेवा करता, मातीची गुणवत्ता, तिची उत्पादकता जपता. जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेती करता, तेव्हा तुम्ही निसर्गाची आणि पर्यावरणाची सेवा करता आणि जेव्हा तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये सहभागी व्हाल, तेव्हा तुम्हाला गोमातेची सेवा करण्याचा बहुमानही मिळेल,” असेही पंतप्रधान म्हणाले.
संपूर्ण जग शाश्वत जीवनशैलीबद्दल बोलत असल्याचे पंतप्रधानांनी सूचित केले. “हे एक क्षेत्र आहे, ज्यामध्ये भारताने अनेक शतके जगाचे नेतृत्व केले, म्हणूनच नैसर्गिक शेतीच्या मार्गावर पुढे जाऊन उदयाला येत असलेल्या जागतिक संधींचा आपण पूर्ण फायदा घेण्याची हीच वेळ आहे,” असे ते म्हणाले.
नैसर्गिक शेती उत्पादनाच्या प्रमाणीकरणासाठीच्या गुणवत्ता हमी प्रणालीबाबतदेखील पंतप्रधानांनी माहिती दिली. प्रमाणीकरण केलेली उत्पादने शेतकरी निर्यात करतात तेव्हा त्याला चांगला भाव मिळतो, असेदेखील ते म्हणाले.
देशभरात ३० हजार ‘क्लस्टर’
पारंपरिक शेतीसाठी संसाधने आणि प्रशिक्षण पुरवणार्या ‘परंपरागत कृषी विकास योजने’सारख्या योजनांच्या स्वरुपात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबतदेखील पंतप्रधानांनी सांगितले. लाखो शेतकर्यांना फायदा मिळावा, यासाठी या योजनेअंतर्गत देशभरात ३० हजार ‘क्लस्टर’ तयार करण्यात आली आहेत. ‘परंपरागत कृषी विकास योजने’अंतर्गत १० लाख हेक्टर क्षेत्र आणले जाईल. गंगा नदी काठी नैसर्गिक शेती कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी नैसर्गिक शेतीला ‘नमामि गंगे’ योजनेशी स्वतंत्र अभियानाच्या स्वरुपात जोडण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.