पुणे : पुण्यातील वातावरणात आज निसर्गाच्या शीत लहरी, वारकऱ्यांचा भक्तिभाव आणि संस्था, संघटना आणि नागरिकांचा सेवाभाव अशा सकारात्मक कृतीने दिवसभर भारावून गेले. पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी आणि सहभागी वारकरी यांच्या सेवेसाठी प्रत्येकाची धडपड हे दृश्य पुणेकर नागरिकांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि आदरातिथ्यचे दर्शन घडवीत होते. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं मुक्काम पुणे शहरात असल्याने त्याच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करीत होते.
तर पालखी सोबत असलेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येकजण हिरीरीने पुढाकार घेत होता. वारकरी दगडूशेठ, दत्त मंदिर भेटीसाठी दाखल झाले होते. शनिवारवाडा, कात्रज उद्यान लाल महाल बघण्यासाठी त्यांची गर्दी होती. टपाल विभागाच्या वतीने त्यांच्या आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील त्यांची सेवा केल्याचे आज चित्र दिसत होते. चहा, पाणी, नाश्ता, रेनकोट, छत्र्या, पिशव्या आदी वस्तूचे वाटप ठिकठिकाणी या वारकऱ्यांना केले जात होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रकांतदादांची टीपणी
दरम्यान काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना वारीत सहभागी होताना पालखीचे दर्शन घेतले. वारकरी वेशात सहभागी झालेल्या दादांना ज्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह वर विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात मला यावर काही प्रतिक्रिया द्यायची नाही. राजयोग आला आहे का? असे विचारले असता मला तसे वाटत नाही आपणास तसे वाटते असे ते पत्रकारांना म्हणाले. शासकीय महापूजा यावेळी कोण करणार? या प्रश्नांच्या उत्तरात चंद्रकांत पाटील यांनी, त्यावेळी जे मुख्यमंत्री असतील ते महापूजा करतील असे सांगितले. दरम्यान पुणे शहरात आज भजने अभंगाचा निनाद होता. ठिकठिकाणी भक्तीमय वातावरण होते.