हा विजय सोपा नव्हता!

    11-Jun-2022
Total Views | 415

MahaMTB


महाराष्ट्राच्या राजकारणातला, या दशकातला सगळ्यात मोठा राजनीती धुरंधर आपल्या पक्षात आहे, हे समजायला अन्य पक्षांपेक्षा भाजपलाच जरा जास्त वेळ लागला. एका बाजूला घराणातल्या वारशाने मिळालेली बेलगाम सत्ता आणि अफाट पैसा, तर दुसर्‍या बाजूला शरद पवारांसारखा अस्तित्वासाठी चिवटपणे लढणारा जुना खेळाडू; फडणवीसांची लढाई या दोघांशींच होती. राऊत वगैरे तर फडणवीसांचे प्रतिस्पर्धीच नाहीत.

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीने धनंजय महाडिकांना फडणवीसांच्या जवळ आणले. भाजपच्या उमेदवाराचा या पोटनिवडणुकीत पराजय झाला. मात्र, वाढलेला मतांचा टक्का महाविकास आघाडीच्या पोटात गोळा आणणाराच होता. नेता होणे सोपे नसते. मायावतींनी उत्तर प्रदेशात ज्या प्रकारे भाजपला दगा दिला होता, तसाच काहीसा प्रकार शिवसेनेने महाराष्ट्रात केला. राजकारणात लोक राजकीय भवितव्यासाठी दाखल होत असतात. वैचारिक अधिष्ठान असले तरी ते राजकारणात सांभाळताच येते असे नाही.

कारण, सत्तारूढ झालेलातुमचा प्रतिस्पर्धी सत्तेचे टॉनिक घेऊन अहीमहीच्या बळाने वाढतो आणि उद्या तुमच्यासाठीच कर्दनकाळ ठरतो. सत्ता गेल्यानंतर नेत्याला स्वत:चे नेतृत्व टिकवून ठेवणे अधिकच कठीण. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे लहानसहान गोष्ट नाही आणि तिथून पदच्युत झाल्यानंतर मनात येणारी नाउमेदी पार करत पुन्हा परत येणेही सोपे नाही. शरद पवार सोडले, तर स्वत:च्या कर्तृत्वावर इथे कोणीच परतलेले नाहीत. जे पुन्हा आले, ते दिल्लीच्या आशीर्वादानेच!

या सगळ्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांचा संघर्ष विषमच! मोदी-शाहंच्या करिष्म्यामुळे महाराष्ट्र भाजपला कितीही बाळसेदार वाटत असले, तरी महाराष्ट्रात स्वत:चा मुख्यमंत्री बसवावा, असा आकडा भाजपकडे कधीच नव्हता. हे वास्तव रिचवून-पचवून फडणवीसांनी पाच वर्षांचा कालावधी दमदारपणे पूर्ण केला. भाजप हाच कुणाच्याही राजकीय भविष्याचा महामार्ग आहे, असा विश्वास त्यामुळे निर्माण झाला. यातून सत्तेची माणसं जवळ आली.

अशी माणसं जवळ तर येतात, पण सत्ता गेल्यावर ती सोडूनही जातात. फडणवीसांना ती सोडून गेली नाहीत, हेदेखील त्यांच्यातल्या नेतृत्वाचे वेगळेपण दाखविणारे. राज्यसभा निवडणूक ही तर त्याची ‘लिटमस टेस्ट’च होती. अपक्ष कुठे जाणार, या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नसते. पण, ते विरोधी पक्षासोबत गेले, तर मग शरद पवारांसारख्यांना फडणवीसांचे कौतुक करावेच लागते.

युत्या-आघाड्यांसाठी केलेल्या क्लृप्त्यांना ‘अजातशत्रू’ असण्याचे एक सुंदर कोंदण दिले जाते. ‘अजातशत्रू असण्यासाठी एक बेरकीपणा लागतो,’ असे पुलं म्हणायचे. यातून मग नेते एकमेकांना सांभाळून घेतात. पक्षात कुठल्याही असलात तरी तुमची तुमच्या समर्थकांची कामे होत राहातात. फडणवीसांनी नेमकी इथे मोठी रेष ओढली. यामागच्या सगळ्याच निवडणुकांतही फडणवीसांनी भाजपचे उमेदवार गांभीर्याने दिले. यातल्या काही जागा जिंकल्या, काही हरल्या. मात्र, आपल्या वाट्याला आलेला राजकीय संघर्ष फडणवीसांनी टाळला नाही.
पर्यायाने सत्ताधार्‍यांना त्यांना गांभीर्याने घ्यावे लागले. राजकीय नेता स्वत:ची राजकीय कारकिर्द जितकी गांभीर्याने घेतो, तितकेच त्याचे समर्थक आणि पक्षही कामाच्या बाबतीत गंभीर होत जातो. याची राजकीय किंमत फडणवीसांनी मोजली. त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. मेट्रोसारख्या त्यांच्या काळात गतीने पूर्ण होण्याच्या प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभातून त्यांना डावलले गेले. राजकारणात हे संकेत महत्त्वाचे असतात. महाराष्ट्रातले सत्ताधारी या माजी मुख्यमंत्री व धुरंधर असलेल्या नेत्याला सन्मानाने वागवू शकले नाहीत.


फडणवीसांनी याबाबत कुठेही कुरकुर केली नाही. दौर्‍यांचा झंझावात चालूच राहिला आणि राजकीय यशापयशही मिळत राहिले. राज्यसभेच्या जागांचे यश हे इतक्या मोठ्या संघर्षानंतर आलेले आहे. वाचाळवीर संजय राऊत काहीही म्हणत असले, तरी शरद पवारांनी हा विजय मान्य केला. मुख्यमंत्र्यांनी सोईने मौन धारण केले आहे. मावळा सोडून वाचाळवीराच्या मागे आपली ताकद लावली की असे होते. राजकारणातल्या जय-पराजयाच्या पलीकडे आज फडणवीस पोहोचले आहेत. शरद पवारांसारख्या नेत्याला पुरून उरणार्‍या या नेत्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121