डोंबिवली : डोंबिवली ‘एमआयडीसी’ भागात अनियमितपणे होणार्या पाणी पुरवठ्याविरोधात आणि ‘शटडाऊन’ काळात जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा बंद ठेवल्याविरोधात नागरिकांनी ‘एमआयडीसी’ कार्यालयावर सोमवारी धडक देत अधिकार्यांना जाब विचारला. गेल्या आठवड्यात ‘एमआयडीसी’तर्फे देखभाल दुरूस्ती कामानिमित्त २४ तासांचा ‘शटडाऊन’ डोंबिवली ‘एमआयडीसी’ निवासी विभागात घेण्यात आला होता. मात्र, ५१ तास पाणीपुरवठा सुरू न झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. रविवारी ‘एमआयडीसी’ कार्यालय बंद असल्याने नागरिकांनी सोमवारी सकाळी ‘एमआयडीसी’ कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकार्यांसमोर आपला संताप व्यक्त केला. तसेच, ‘शटडाऊन’च्या ठरवलेल्या वेळेनंतरही पाणीपुरवठा सुरळीत का झाला नाही, असा सवालही केला.
कार्यकारी अभियंता रमेश पाटील हे रजेवर असल्याने साहा. अभियंता विजय धामापुरकर आणि कनिष्ठ अभियंता निलेश भोपाळे यांनी सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्वीकारले व सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच, ‘एमआयडीसी’ विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. येत्या वर्षभरात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. ‘शटडाऊन’च्या काळातील नियोजित सर्व कामे पूर्ण झाली होती.
मात्र, पाणीपुरवठा सुरू करण्याच्या वेळेस अंबरनाथ येथे ‘एमआयडीसी’ची पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती धामापूरकर यांनी दिली. दरम्यान, कल्याण ग्रामीण परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिक अजूनही संयमाची भूमिका घेत आहेत. मात्र, येत्या काळात निवासी भागातील पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास भविष्यात नागरिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. यावेळी राजू नलावडे, नंदू परब, धर्मराज शिंदे, भालचंद्र म्हात्रे, विवेक देशपांडे, संजय चव्हाण, विनय तटके, करिश्मा प्रताप, प्रिया व आनंद दामले, सतीश पाटील, सी. आर. देशपांडे, निखिल कुलकर्णी, किरण भोसले, बेबी पाटील, संध्या सराफ, निर्मला मानकर, अजय देसाई, गंगा चंद, उदयसिंग सुव्रे, मुकुंद वैद्य, राजू देवरासकर उपस्थित होते.