मुंबई (प्रतिनिधी) : “राज्यात 2019 साली सत्तांतर झाल्यानंतरच विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ झाली,” अशी व्यथा चांदिवलीतील स्थानिक नागरिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे मांडली. चांदिवली येथील खैराणी रोड परिसरात ‘नाहर अमृतशक्ती’ हे एक मोठे संकुल आहे. विविध समाजाचे नागरिक याठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, आमचा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंग्यांमुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाला विरोध आहे. 2019पूर्वी या परिसरातील ध्वनिप्रदूषणाची परिस्थिती ठीक होती. ध्वनिक्षेपकांमधून फार मोठ्या प्रमाणात आवाज यायचा नाही.
मात्र, 2019 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या परिसरातील भोंग्यांमधून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होण्यास सुरुवात झाली. खैराणी रोड परिसरात भोंग्यांचीही संख्या वाढल्याचे नागरिक सांगतात. या आधी ज्या प्रार्थनास्थळांवर भोंगे लावले जात नव्हते त्याठिकाणीही ध्वनिक्षेपक बसविण्यास सुरुवात झाली. ‘लेक होम्स’, मनुबाई चाळ, पवार पब्लिक स्कूल आदी परिसरातील विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांमधून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याची कैफियत येथील स्थानिक नागरिक मांडतात. जवळपास एक किलोमीटर दूरपर्यंत ध्वनिक्षेपकांमधून आवाज ऐकू येतो. लांब राहणार्या परिसरात ही परिस्थिती आहे, तर ध्वनिक्षेपकानजीक राहणार्यांचे काय हाल होत असतील, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. भाजप आणि मनसे हे दोन राजकीय पक्ष या विषयासंदर्भात जनतेला होणार्या त्रासाबद्दल आवाज उठवत आहेत, त्यासाठी या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुसंख्य जनतेला होणार्या या त्रासाला वाचा फोडली. कायदा सगळ्यांना सारखा आहे. विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यातून होणार्या आवाजाला परवानगी असेल, तर इतर धर्मीयांसाठीही बंदी नसावी. सर्वधर्मसमभाव हा मुद्दा सगळ्यांसाठी लागू असावा. एक मनसैनिक म्हणून मला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला हेच वाटते.
-किशोर कोरगावकर, शाखाध्यक्ष, प्रभाग क्र. 157, चांदिवली.