मुंबई : "राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत मुंब्र्याचं नाव का घेतलं हे काही मला समजलं नाही. पण माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, की त्यांनी स्वतः मुंब्र्यातील कुठल्याही मदरश्यात पोलीस संरक्षणाशिवाय येऊन दाखवावं आणि दाढी करण्याचा एक वस्तरा शोधून दाखवावा. मुंब्र्याच्या एखाद्या जरी मदरश्यात तो सापडला तर मी राजकारण सोडून देईन. जाहीर सभेत टाळ्यांसाठी बोलणं खूप सोपं असतं. मात्र अशा व्यक्तव्याचे परिणाम काय होतील आणि महाराष्ट्रभर त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करावा.", असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सुनावल्याचे दिसून आले. शनिवारी (दि. २ एप्रिल) शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मुंब्र्याचा उल्लेख केला होता. त्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते माध्यमांशी बोलत होते. यावरूनच आव्हाडांचे असे सुनावणे म्हणजे राज ठाकरेंना दिलेला धमकीवजा इशारा तर नव्हे? असा प्रश्न सध्या उद्भवला आहे.
"निष्कारण जाती-धर्मांत आग लावण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. महाराष्ट्रात दंगली घडवण्याच्या प्लान यांच्याकडून आखण्यात येत असून याचे मुख्य सूत्रधारही तेच आहेत.", असेही आव्हाड पुढे म्हणाले.