मुंबई : 'शिवसेनेच्या ताब्यात गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेची सत्ता आहे, पण ते मुंबईकरांना कुठल्याही मूलभूत सुविधा देऊ शकले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली मुंबई मेट्रो देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात कार्यान्वित झाली. त्यामुळे मुंबईकरांसाठी जे जे आवश्यक होते ते तुम्हाला २५ वर्षात करता आले नाही, पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांसाठी ते सर्व अवघ्या ५ वर्षांत करून दाखवलं.' असे म्हणत भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर आपली तोफ डागली. शुक्रवार, दि. २२ एप्रिल गिरगाव येथे भाजपतर्फे आयोजित 'पोलखोल' सभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा, जिल्हाध्यक्ष शरद चिंतणकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक गिरगांवकर रहिवासी आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
आ.अमित साटम शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, मराठी माणसाच्या मुंबईत मराठी भाषेला शिवसेनेने हाल सोसायला लावले. शिवसेनेने मराठी तरुणांना काय दिलं ? किती मराठी मुलांना नोकरी दिली ? याचे उत्तर द्या. निवडणूक काळात फक्त मराठी अस्मितेला हात घालायचे, आश्वासने द्यायची निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर फक्त भ्रष्टाचार करायचा हेच शिवसेनेचे धोरण राहिलेले आहे. एकट्या मुंबई महापालिकेत 25 वर्षांत किमान 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. फक्त स्थायी समितीचा विचार केला तर मागील 4 वर्षात पास झालेल्या 52 हजार कोटींच्या प्रस्तावात किती भ्रष्टाचार झाला हे मुंबईकरांनी पाहिलंय,' या शब्दांत त्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढले.
'कोरोनाकाळात मुंबईकर वणवण फिरत होते तेव्हा शिवसेनेचे नेते मालमत्ता गोळा करत होते हे यशवंत जाधवांच्या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. त्यांच्या डायरीतून समोर आलेली एम ताई अन केबलवाला ही नावे आणि या व्यक्ती नेमक्या कोण आहेत ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भ्रष्टाचारावर आवाज उचलला म्हणून तुम्ही आम्हाला अडवाल पण दीड कोटी मुंबईकर जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारायला येईल तेव्हा मुंबईकरांना कसे अडवणार ?' असा थेट सवाल त्यांनी शिवसेना नेतृत्वाला विचारला आहे.
१० हजार कोटींचे नुकसान बालहट्टामुळेच !
'मुंबई मेट्रोचा महत्त्वपूर्ण प्रकल्प रोखल्याने मुंबईकरांना 10 हजार कोटींचे नुकसान फक्त बालहट्टामुळे सहन करावे लागले. मुळात जे राज्याचे पर्यावरण मंत्री आहेत, त्यांना पर्यावरणातील काहीही समजत नाही. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेत शिवसेनेने केवळ वसुली म्हणजेच निव्वळ वाझेगिरीच राबवली. त्यामुळे मागील २५ वर्षांमध्ये झालेली लूट थांबवविण्यासाठी आणि मुंबईकरांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून मुंबईत बदल घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असा विश्वास आमदार अमित साटम यांनी यावेळी दिला.
मुंबईत स्वच्छ प्रशासनाची आवश्यकता !
'मुंबई महापालिकेचा कारभार कसा चालतो हे मुंबईकरांना माहिती आहे. आपली मुंबई एक जागतिक दर्जाचे शहर आहे. त्याच्या वैभवात भर पाडण्यासाठी मुंबई महापालिकेत स्वच्छ प्रशासनाची गरज आहे. मुंबईकरांनी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा.'
- आ. मंगल प्रभात लोढा, अध्यक्ष, मुंबई भाजप आणि आमदार मलबार हिल मतदारसंघ