सद्य:स्थितीत ‘एकात्म मानव दर्शना’ची उपयोगिता

    17-Apr-2022
Total Views | 96

dindayal
 
 
सर्पिलाकार मंडलाकृतीच्या केंद्रस्थानी व्यक्ती, व्यक्तीशी संबंधित एक वर्तुळ कुटुंबाचे, कुटुंबाशी संबंधित एक वर्तुळ समाज, जात, नंतर राष्ट्र, विश्व आणि नंतर अनंत ब्रह्मांड व सर्वजण एकमेकांचे पूरक आणि सहकारी, कोणातही संघर्ष नाही, असे ‘एकात्म मानवदर्शन’ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २२ ते २५ एप्रिल १९६५ दरम्यान मुंबईत दिलेल्या व्याख्यानांमध्ये प्रस्तुत केले. त्या पृष्ठभूमीवर ‘एकात्म मानवदर्शना’विषयीच्या लेखाचा आज पहिला भाग...
 
 
 
पंडित दीनदयाळजींनी ‘एकात्म मानव दर्शन’ मांडून ५५ पेक्षा जास्त वर्षे झाली. त्यापूर्वीच म्हणजे १९६४ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचे नेहरूपर्व संपले होते. तशी १९६२ च्या चीन युद्धात पराभव झाल्यापासूनच नेहरूंच्या सर्वच धोरणांची समीक्षा होत होती. विरोधी पक्षात भारतीय जनसंघ हा एकच राजकीय पक्ष असा होता की, ज्याची धोरण सूत्रे नेहरू धोरण सूत्रापेक्षा एकदम वेगळी होती. बाकी बहुतेक विरोधी पक्ष नेहरूंच्या विचारांशी कुठेना कुठे जुळणारे होते. त्यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय जनसंघाचे महासचिव होते व ते आपल्या अभ्यासपूर्ण मुद्द्यांनी नेहरू धोरणांना विरोध करीत असत. नेहरूपर्वानंतर नेहरूंच्या धोरणांना नुसता विरोध करून भागणार नव्हते, तर राष्ट्रनिर्मितीची एक नवी दिशा स्पष्ट करणे गरजेचे झालेले होते. पंडित दीनदयाळजींनी एप्रिल १९६५ मध्ये ‘एकात्म मानव दर्शन’ मांडून तीच गरज पूर्ण केली. त्यानेच जनसंघाच्या धोरणात निश्चितता आली. आजचा ‘भाजप’ अजूनही या धोरणाचे सूत्र मान्य करत आला आहे व त्यावर आधारित धोरणांची आखणी करण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणूनच सद्य:स्थितीत ‘एकात्म मानव दर्शन’ कितपत उपयोगी ठरते, हे पाहणे गरजेचे आहे.
 
 
नेहरूपर्व (१९४७-१९६४)
नेहरूपर्व समजल्याशिवाय दीनदयाळजींचे ‘एकात्म मानव दर्शन’ समजणार नाही हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंच्या नेतृत्वाने सत्ता हाती घेतली व त्यांच्या विचारानेच भारतीय विकासाचे वा प्रगतीचे मॉडेल अंमलात आणले गेले, हा इतिहास आहे. नेहरू पाश्चिमात्य लोकशाही विचाराने जसे प्रभावित होते, तसे योजनाबद्ध विकासाच्या ‘रशियन मॉडेल’नेही प्रभावित होते. त्यामुळे भारतासाठी त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीची लोकशाही निवडली व आर्थिक विकासासाठी ‘रशियन मॉडेल’ स्वीकारले. नेहरूंची राष्ट्रनिर्माणाची कल्पना त्यांच्या ‘समाजवादी समाजरचना’ या घोषणेत आहे आणि त्यांची या घोषणेमागची विचारसरणी व ऐतिहासिक पार्श्वभूमी सर्वार्थाने पाश्चिमात्य होती हे लक्षात आले तर नेहरूपर्व समजणे सोपे होते. ‘समाजवादी समाजरचने’च्या स्वप्नपूर्तीसाठी नेहरूंनी पाश्चात्य जीवनपद्धतीला उपयुक्त अशी सर्वच नीति-धोरणे अंमलात आणण्याचा प्रयत्न केला व त्या दृष्टीने संस्था उभारल्या, मग त्या शिक्षण क्षेत्रातील असोत, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असोत का उद्योग क्षेत्रातील असोत. त्याचाच परिणाम म्हणून पाश्चात्यांच्या आचारविचाराचे अनुकरण हेच भारतीय राष्ट्रीयतेचे प्रतीक ठरले. नेहरू पर्वात महात्मागांधींच्या ‘स्वराज्य’ कल्पनेलाही तिलांजली देण्यात आली. कारण, महात्मा गांधींचे ‘स्वराज्य’ ‘रामराज्य’ कल्पनेवर आधारित होते, ज्यात प्रामुख्याने भारतीय आचार, विचार, संस्कार, ग्राम स्वावलंबन, देशी उद्योग वा विकेंद्रित अर्थव्यवस्था वगैरेला महत्त्व होते. नेहरूंची ‘समाजवादी समाज रचना’ व त्यात आलेला प्रत्येक विचार मग तो लोकशाहीचा असो वा, आर्थिक विकासाचा असो, शासन व्यवस्थेचा असो वा, न्यायव्यवस्थेचा असो पाश्चात्य होता हा यातला महत्त्वाचा भाग. नेहरूंनी स्वीकारलेले विकासाचे ‘रशियन मॉडेल’ फार काही करू शकले नाही व हे मॉडेल देश तिशीत पोहोचेपर्यंत म्हणजे १९८० पर्यंत कोलमडले. पुढे चाळिशीत म्हणजे १९९० मध्ये, तर हे मॉडेल पूर्णपणे बदलावे लागले, हा इतिहास महत्त्वाचा आहे.
 
‘एकात्म मानव दर्शना’ची पार्श्वभूमी
पंडित दीनदयाळजींनी ‘एकात्म मानव दर्शन’ १९६५मध्ये मांडले म्हणजे नेहरूपर्व संपल्यानंतर. देशाला स्वातंत्र्य मिळून १७ वर्षे झाली होती व एकंदरीत भारताने विकासाची काही दिशा घेतली होती व त्यातील त्रुटींनी समस्याही निर्माण झाल्या होत्या. चीनबरोबर युद्ध होऊन पराभव झाला होता. फाळणीनंतर पाकिस्तान भारताबरोबर सुखाने नांदण्यास तयार नव्हता व भारतात हिंसा घडवून आणण्याच्या उद्देशाने कार्यरत होता. चीन भारतीय भूमी हडपूनही अरेरावी करतच होता. अलिप्त धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत एकटा पडला होता. अन्नधान्यासहित आर्थिकदृष्ट्या भारत बाहेरच्या मदतीवर अवलंबून होता. सर्वच निर्णय सरकार घेत असल्याने शासन भ्रष्टाचारात रूतत चालले होते. निवडणुकीचे राजकारण सामाजिक-राजकीय वातावरण गढूळ करत होते व नेते वा पक्ष नैतिकता विसरत चालले होते. इंग्रजी शिक्षणाने भारतीय विचार व भाषा मागे पडत होत्या व महत्त्वाचे म्हणजे हे शिक्षण बेरोजगारी वाढण्यास कारणीभूत होत होते. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न कायम होता व हिंदू-मुस्लीम तेढ वाढतच होती. शेतकरी व त्याची शेती अजूनही गरिबीशी व कमी उत्पादन व्यवस्थेशी झगडत होती. जुनी ग्रामीण व्यवस्था कोलमडत होती. उद्योग क्षेत्र शासनाच्या ‘लायसन्स राज’मध्ये अडकले होते. भाषावार प्रांत रचना झाली होती व सर्वच राज्य अस्मितेच्या अहंकारात गुंतत चालली होती. लोकशाही होती, पण निवडणुकीच्या राजकारणाने तिला कीड लागत होती. स्वातंत्र्यानंतर एकाच पक्षाची व एकाच नेत्याची सत्ता असल्याने नेते व पक्ष अहंकाराकडे व हुकूमशाहीकडे वळत होते. अशा परिस्थितीत राष्ट्रनिर्माण कल्पना मांडणे व तिला वैचारिक अधिष्ठान देणे गरजेचे झाले होते. पंडित दीनदयाळजींनी त्याचाच प्रयत्न केला व ‘एकात्म मानव दर्शन’ मांडले.
 
‘एकात्म मानव दर्शना’चे मूळ भारतीय
‘एकात्म मानव दर्शन’ पं. दीनदयाळजींनी मांडले म्हणजे त्यांनी काही मूलभूत वैचारिक सिद्धांत मांडला असे नाही. हा विचार पूर्णपणे भारतीय मातीतला असून प्राचीन आहे. भारतीय विचार परंपरा आपल्या सर्वच विचारांना वाहते ठेवते आणि त्यामुळेच भारतीय विचार कधीच एका ठिकाणी, एका व्यक्तीत वा एका ग्रंथांत साचून राहिले नाहीत. भारतीय तत्त्वज्ञान त्यामुळेच विकसनशील मानले जाते. त्यात पिढी दर पिढी भर टाकणारे साधू-संत वा विद्वान होत गेले व त्यांनी काळानुरूप मूळ विचारात भर टाकून विचारांना बदलत्या वास्तविकतेच्या जवळ ठेवले. आधुनिक काळाचा विचार केला, तर गौतम बुद्धांनंतर शंकराचार्यांनी ही परंपरा चालवली. पुढे स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी-विनोबांनी त्यात भर टाकली. पंडित दीनदयाळ उपाध्याय अशाच विकसनशील परंपरेतील एक दृष्टे विचारक होते. दत्तोपंत ठेंगडी यांच्या शब्दात सांगायचे, तर पंडित दीनदयाळजींनी प्राचीन भारतीय सत्य सनातन ज्ञान परिवर्तित परिस्थितीत नवीन रूपात मांडले.
 
‘एकात्म मानव दर्शन’ नवीन वाद (इजम) मांडत नाही
आणखी एक गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ‘एकात्म मानव दर्शन’ नव्याने कुठला नवीन ‘वाद’ सांगत नाही किंवा असलेल्या समाजवाद, साम्यवाद वा भांडवलवाद वगैरेला प्रत्युत्तरही देत नाही. कारण, दीनदयाळजींच्या मते कुठलाही ‘वाद’ वा इजअ जेथे जन्मतो, तेथील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो व तेवढीच त्याची सत्यता असते. त्याचा दुसर्‍यांना दुसर्‍या ठिकाणी उपयोग होईलच, अशी खात्री देता येत नाही. म्हणून कुठलाही विचार हा जिथल्या-तिथल्या समाज व संस्कृतीच्या आधाराने मांडला गेला, तरच उपयोगी ठरू शकतो. म्हणून त्यांच्या मते कुणाच्या जीवन पद्धतीच्या अनुकरणाने वा वैचारिक व इतर विशेष परावलंबनाने राष्ट्र उभे राहत नसते, तर स्वकीय साधनसामुग्रीच्या संवर्धनातून व सामर्थ्यातून ते उभे करावे लागते. राष्ट्रीयता व राष्ट्रीय भावना या फक्त भौगोलिक सीमांमुळे जागृत होत नसतात, तर त्याला परंपरागत सांस्कृतिक वारशाची ओळख लागते. एका एकात्म व समान इच्छेची प्रत्येक नागरिकात वा जनमाणसात निर्मिती झाल्याशिवाय राष्ट्रभावना व्यक्त होत नाही. कारण, वेगवेगळ्या इच्छा असणारा समाज-देशहिताचा विचार करत नाही. हाच ‘समान इच्छा’ निर्माण करणारा विचार व अशी इच्छा धारण करणारा समाज निर्मिणे म्हणजे ‘एकात्म मानव दर्शन’ असे म्हणता येईल.
 
 
- अनिल जवळेकर
 
(लेखाचा दुसरा भाग पुढच्या सोमवारी)
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121