इस्लामचे, कुराणचे, शरियतचे नाव घेऊन धर्मांध मुस्लिमांनी काश्मिरी हिंदूंना घरेदारे सोडून पलायनासाठी अगतिक केल्याचे, मुली-महिलांवर बलात्कार केल्याचे, विरोध करणार्यांना कापून टाकल्याचे, कीड्या-मुंगीसारखे मारुन टाकल्याचे, नरसंहार केल्याचे प्रकार घडलेच नाहीत, अशा आविर्भावात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारजंतांची ‘द काश्मीर फाईल्स’विरोधातील मळमळ बाहेर पडत आहे.
धर्माच्या आधारावर हिरव्या पिलावळीने काश्मिरी हिंदूंवर केलेल्या घृणास्पद अत्याचाराची सत्यकथा दाखवणार्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला दर्शकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटगृहांतील मर्यादित पडद्यांवर प्रदर्शित होऊनही तुफान यश मिळवत असल्याचे त्याच्या दैनंदिन कमाईवरुनही समजते. ‘द काश्मीर फाईल्स’ने पहिल्याच दिवशी साडेतीन कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला, एक हजारपेक्षाही कमी पडद्यांवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अशी कामगिरी करणे आश्चर्यच. अजूनही ‘द काश्मीर फाईल्स’ भारतीय हिंदूंची मने चित्रपटगृहापर्यंत घेऊन येत आहे अन् त्यानंतर आपल्याच देशातील आपल्याच हिंदूबांधवांवरील अन्याय पाहून व्यथित होत आहे, विदीर्ण होत आहे. त्याचवेळी धर्मांध मुस्लिमांच्या, इस्लामी जिहाद्यांच्या करणीविरोधात संतापतानाच भारतीय हिंदूंना काँग्रेससह डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतावाद्यांच्या ढोंगाचीही जाणीव होत आहे. त्यामुळेच, ‘द काश्मीर फाईल्स’च्या अफाट यशाने अन् भारतीय हिंदूंमधील जागृतीने पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतवाद्यांच्या बुडाला वणवा लागल्याचेही त्यांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट होते. अर्थात, त्यांच्या अंगविशेषातून एकाचवेळी निघणार्या जाळ अन् धुरामुळे राष्ट्रनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठांना जिरवल्याचा, गाडल्याचा आनंद आहेच.
‘द काश्मीर फाईल्स’च्या संबंधाने छद्म पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांच्या प्रतिक्रियांत वैफल्याबरोबरच तगमग, तडफडही दिसून येते. पण, त्यातल्या अनेकांच्या प्रतिक्रिया, तर मोठमोठी विशेषणे लावून मिरवणारे या लोकांचे टोळके हिंदूंविषयी किती असहिष्णु आहे, हेही दाखवून देतात. “काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट होती, तर देशाच्या पंतप्रधानपदी व्ही. पी. सिंग होते, काँग्रेस नव्हती. भाजपने व्ही. पी. सिंगना पाठिंबा दिलेला होता. पण, काश्मीरमधील घटनांनंतरही भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही,” असे लिहितानाच, “‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री आणि भाजपला आताच्या घडीला आपल्याला हवे ते घडवून आणायचे आहे, राजकीय फायदा मिळवायचा आहे,” अशाप्रकारे हे लोक व्यक्त होताहेत. हे तेच लोक आहेत, जे दिल्ली दंगलीतील ताहिर हुसैनला, तुकडे तुकडे गँगवाल्या उमर खालिदला पाठीशी घालतात, दहशतवाद्यांसाठी मध्यरात्रीही न्यायालये उघडायला लावतात. पण, त्यांच्या मांडणीमध्ये काश्मिरी हिंदूंवरील हिरव्या पिलावळीच्या जीवघेण्या अत्याचाराविषयी चकार शब्दही नसतो. इस्लामचे, कुराणचे, शरियतचे नाव घेऊन धर्मांध मुस्लिमांनी काश्मिरी हिंदूंना घरेदारे सोडून पलायनासाठी अगतिक, मुली-महिलांवर बलात्कार केल्याचे, विरोध करणार्यांना कापून टाकल्याचे, कीड्या-मुंगीसारखे मारल्याचे, नरसंहार केल्याचे प्रकार घडलेच नाहीत, अशा आविर्भावात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी विचारजंतांची ‘द काश्मीर फाईल्स’विरोधातील मळमळ बाहेर पडत आहे.
इथेच दहशतवाद्यांनी, धर्मांधांनी हिंदूंना जाळून टाकले, हिंदूंचे शिरच्छेद केले वा हिंदूंच्या प्रेतांचे मिनार उभे केले तरी हे लोक टाळ्या पिटत आनंदच साजरा करतील, हे दिसून येते. इतकेच नव्हे, तर स्वतःला मानवाधिकारवादी म्हणवून घेणार्यांच्या संवेदना काश्मिरी हिंदूंवरील भयानक प्रकारांबाबत पार बधीर झाल्याचेही यातून सिद्ध होते. भाजपला वा भाजपच्या सत्तेला विरोध करायचा असेल, तर जरुर करा, त्यावर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. ते करतानाच निदान, काश्मिरी हिंदूंंनी भोगलेल्या धर्मांध मुस्लिमांच्या, इस्लामी जिहाद्यांच्या अन्याय-अत्याचाराची कबुली तरी द्या. पण, तसे होत नाही, यावरुनच तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांच्या लेखी मानवाधिकार फक्त मुस्लिमांना असतो, ख्रिश्चनांना असतो, दहशतवाद्यांनाही असतो, पण हिंदूंना कधीच नसतो, हे दिसून येते. तसे नसते तर ‘कश्मिरी हिंदुओ हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’च्या घोषणा या टोळक्याने दिल्या असत्या वा ‘आय अॅम हिंदुस्थान, आय अॅम अशेम्ड’, ‘जस्टीस फॉर काश्मिरी हिंदुज’ अशी फलकबाजी केली असती वा गेली ३२ वर्षे आपली मातृभूमी सोडून देशोधडीला लागलेल्या काश्मिरी हिंदूंचे सांत्वन केले असते. पण, तसे काही करण्यापेक्षा ढोंगी पुरोगामी, धर्मनिरपेक्ष उदारमतवादी विचारजंतांनी काश्मिरी हिंदूंनी भोगलेले दुःख, त्रास, वेदना पडद्यावर आणणार्या ‘द काश्मिर फाईल्स’लाच विरोध केला, त्यातही राजकारण शोधले, त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच.
दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’मुळे डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतावाद्यांना मिरची झोंबण्याचे आणखी एक कारण म्हणजे, वर्चस्वाला मिळालेले आव्हान. स्वातंत्र्यापासूनच देशातील विविध कलाप्रकारांत डाव्या ‘इकोसिस्टीम’ने वाट्टेल ते, हवे तेच केले, दाखवले. भारतातील बहुसंख्य हिंदू, इथल्या संस्कृतीच्या गौरवापेक्षा त्याची हेटाळणी करण्यावरच भर दिला. आम्ही सांगू तेच खरे, त्याहून निराळे सत्य असूच शकत नाही, अशाप्रकारे हे लोक वागत होते. काँग्रेसी सरकारांच्या कृपेने या लोकांचे हे सगळे खेळ रंगत असत. पण, याला विरोध करणारा, बहुसंख्य हिंदूंच्या आवाजाला व्यासपीठ मिळण्याची मागणी करणारा विचार तेव्हाही होताच. तोच विचार २०१४नंतर अधिक प्रखरतेने समोर आला आणि आता तर ‘द काश्मीर फाईल्स’ वा त्याआधीच्या ‘द ताश्कंद फाईल्स’ने काँग्रेसी, डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवाद्यांची बेअब्रू केल्याचे दिसून आले. म्हणजेच, यापुढचा काळ हिंदूंचे भावविश्व पडद्यावर दाखवणार्यांचा, इथल्या संस्कृतीचा आदर करणार्यांचाच असेल, असे म्हणता येते. त्याचमुळे आपल्या चित्रपटांसह विविध कलाप्रकारातील एकछत्री साम्राज्याला घरघर लागल्याने डावी ‘इकोसिस्टीम’ अस्वस्थ आहे, ‘द काश्मीर फाईल्स’ला होणार्या विरोधाचे हे महत्त्वाचे कारण आहे. अर्थात, त्यामुळे काही होणार नाही. उलट डाव्या‘ इकोसिस्टीम’ने आणखी मोठ्याने भोकाड पसरुन रुदाल्या गाव्या, त्याचा परिणाम शून्यच होईल. कारण, आता जनताही जागृत झालीय, तिला डाव्या ‘इकोसिस्टीम’बद्दल काडीचीही सहानुभूती वाटत नाही, तर त्यांची रडारड पाहून जल्लोष करावासा वाटतो.