मुंबई : भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली तरीही ब्रिटीशांनी करून ठेवलेले काही कायदे आजही अस्तित्वात आहेत. याच कालबाह्य झालेल्या कायद्यांचा आढाव घेऊन हे कायदे बदलण्याची गरज असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हंटले आहे.मुंबईतील विले-पार्ले येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन अभ्यास केला पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे असंही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.
शिवाय आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान फार कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबईतील विले पार्ले येथील मा. कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन १३ मार्च रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता देखील उपस्थितीत होते.