नागपूर : महाराष्ट्राच्या विधिमंडळात कर्नाटकशी सुरू असलेल्या सीमाप्रश्नाचा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतर आता कर्नाटकच्या मंत्र्यांचा तीळपापड झाला, आहे. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधिमंडळात याचे पडसाद उमटू लागले आहेत. मुंबई केंद्रशासित करा, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी केले. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत २० टक्के कन्नडीग असल्याचा जावईशोध कर्नाटकच्या मंत्र्यांनी लावला असून याच मुद्द्यावर त्यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे.
याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही!", असे म्हणत कर्नाटक सरकारला त्यांनी थेट इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकचे मंत्री नारायण यांनी केलेल्या विधानावर ते बोलत होते. "केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत. सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही," असेही फडणवीस यांनी सांगितले.