मुंबई : वातावरणीय बदलांचा परिणाम जाणवू लागला असून, ऐन थंडीच्या दिवसात उकाड्याचा अनुभव मुंबईसह परिसरातील नागरिकांना येत आहे. हिवाळ्यातही उष्णतेचे वाढत जाणारे हे प्रमाण यापुढे दरवर्षी असेल, असा इशाराच पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे आगमन होत असते, ते यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाले. त्यातही आलेली गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असतानाच अचानक थंडीतील गारवा लुप्त झाला आणि उकाडायला लागले आहे. मुंबईपेक्षा पुण्यात हवेचा गारवा अधिक असतो. यंदा पुण्यातही तीच स्थिती असून या वर्षी पुणे शहर परिसरात डिसेंबर महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यापेक्षा मुंबईच्या तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसचा फरक असतो. पुण्यात ज्यावेळी कडाक्याची थंडी असते, त्यावेळी मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत असतात. यंदा मात्र पुण्यातूनच थंडी गायब झाल्याने थंडीत भल्या पहाटे भटकंती, त्यानंतर गरमागरम वाफाळलेला चहाचा घोट घेण्याचा आनंद मुंबईकरांना काही लुटता येत नसल्याचे दिसते.
डिसेंबर महिन्यात पुण्याचे तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असते. २०१९चा अपवाद वगळता पुणेकर कडाक्याच्या थंडीचा आनंद घेत असतात. तसेच पुण्यातील रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होत असते. यंदा मात्र पुण्याच्या तापमानाने अक्षरश: उचांक गाठला असून शनिवारी दिवसाचे तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर हे तापमान सर्वसाधारणपेक्षाही २.६ अंश सेल्सिअस अधिक असल्याचे मत हवामान विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
रात्रीच्या तापमानातही सहा ते सात अंशांची वाढ झाली असून सध्या पुण्यात रात्रीचे तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान असते. या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की पुण्यात थंडीचे प्रमाण इतकेसेही नाही. पुण्याची अवस्था ही आहे, तर मुंबईतही ऐन थंडीच्या दिवसात दिवसा घामाच्या धारा सुरू असतात. शरीराची लाहीलाही होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे हवेत काहीसा गारवा वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
लोकरीच्या कपड्यांना ग्राहकच मिळेना
दरवर्षी थंडीच्या दिवसात तिबेटी लोक मुंबई, पुण्यात येतात. त्यांच्याजवळील विणलेले लोकरीचे गरम कपडे सर्वांसाठीच आकर्षण असते. ही मंडळी फुटपाथवर किंवा अन्यत्र जिथे कुठे जागा मिळेल, तिथे आपले बस्तान बसवतात. पुढील दोन ते तीन महिने आपला व्यवसाय करुन ते आपापल्या गावी परतात. यंदा मात्र या मंडळींकडे ग्राहकांनीच पाठ फिरवली आहे. कारण, थंडीची तीव्रता नसल्याने लोकरीच्या कपड्यांना ग्राहकच मिळेनासे झाले आहेत.