मुंबई : अंधेरी पूर्व येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी (अंधेरी पोटनिवडणूक) दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे आशीर्वाद मिळवणे आणि त्याचे मतात परिवर्तन करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. अशा या वातावरणात अंधेरी पूर्वेत नवा चमत्कार घडणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेतल्याने अंधेरीत नवीन चमत्कार घडणार का ? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
शिंदे - राज भेटीची चर्चा
शनिवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन होते. यावेळी उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा देखील झाली. तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित असल्याचे माध्यमांमध्ये बोलले जात आहे. मात्र, अधिकृतपणे या भेटीचा तपशील उघड करण्यात आलेला नाही. एकीकडे अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणतल्याने या भेटीचे अन्वयार्थ काढले जात आहेत.
मुंबई काँग्रेसचे नेते वर्षावर
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ भेटीनंतर मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ एकनाथ शिंदेंच्या 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले होते. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते मिलिंद देवरा, माजी मंत्री आ. वर्षा गायकवाड आणि आ. अमीन पटेल हे देखील सहभागी होते. मुंबई महापालिकेचे निवासी भाडेकरू, BIT चाळ भाडेकरू, पोलिस आणि सफाई कामगारांसाठी कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे आणि धारावीच्या पुनर्विकासाबाबत करण्यात आलेली चर्चा हा भेटीचा हेतू असल्याचे देवरा यांनी ट्विटमधुन स्पष्ट केले आहे.
अंधेरीवरून काँग्रेसमध्ये वादाची चर्चा
अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी आपला उमेदवार उतरावा, असा मुंबई काँग्रेसमधील काही नेत्यांचा होरा असल्याचे बोलले जात होते. अंधेरीच्या निमित्ताने मुंबईतील काँग्रेसच्या संघटनेला ऊर्जा मिळेल आणि आपली ताकद आपल्याला आजमावून पाहता येईल, अशी धारणा काही नेत्यांनी व्यक्त केली होती.
परंतु, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाला थेट पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील असंतोषाला धुमारे फुटले होते. त्यातच काँग्रेस नेत्यांनी विकासाचे कारण सांगून घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट आणि भेटीचे टायमिंग यामुळे अंधेरीत चमत्कार होणार का ? याची जोरदार चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.