ओमिक्रॉन भीती नको, स्वयंशिस्त बाळगा!

    04-Jan-2022
Total Views | 110

omicron.jpg

डिसेंबर २०२१च्या मध्यापासून कोरोनाचे रुग्ण मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशात वाढताना दिसू लागले. त्यातही ‘ओमिक्रॉन’चा धसका घेण्याची जरुरी नाही. कारण, गेल्या पावणे दोन वर्षांत आपण पहिल्या दोन लाटेचा यशस्वीपणे सामना केला आहे. फक्त स्वयंशिस्तीची गरज आहे.
मार्च २०२०ला सुरु झालेले कोरोनाचे शुक्लकाष्ट अजूनही चालूच आहे. सप्टेंबर २०२० पासून साथ आटोक्यात येत आहे, असे वाटू लागले. पण, ‘डेल्टा व्हायरस’मुळे उद्भवलेली ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयावह होती. एप्रिल २०२१च्या दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. रुग्णालयांत बेड उपलब्ध नव्हते. ऑक्सिजनचा तुटवडा होता. काही ठिकाणी ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयावह होती. पुन्हा अनेक बंधने लादण्यात आली. पुन्हा जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. ऑगस्ट २०२१पर्यंत हे मृत्यूचे तांडव चालू होते. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली, तर डेंग्यू फिवर आणि चिकनगुनियाच्या साथीने जोर धरला. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२१लाकोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली होती व जनजीवन सामान्य होऊ लागले होते.अशा वेळेस ‘ओमिक्रॉन’ या ‘व्हेरिएंट’च्या लाटेचे संकट उभे राहिले. कोरोना ‘व्हायरस’च्या जनुकीय रचनेत सारखे बदल होत होते. त्यातूनच ‘डेल्टा व्हायरस’ व ‘ओमिक्रॉन’हे म्युटंट ‘व्हायरस’ निर्माण झाले व ते जगभर पुन्हा हाहाकार माजवू लागले.



डिसेंबर २०२१च्या मध्यापासून कोरोनाचे रुग्ण मुंबईत, महाराष्ट्रात आणि देशात वाढताना दिसू लागले. त्यातही या लाटेचा धसका घेण्याची जरुरी नाही. कारण, गेल्या पावणे दोन वर्षांत आपण पहिल्या दोन लाटेचा यशस्वीपणे सामना केला आहे. अनेक सामाजिक बंधने आपण या काळात पाळली. ‘लॉकडाऊन’, ‘वर्क फ्रॉम होम’, मुलांचे ऑनलाईन क्लास, सुटलेला रोजगार या सर्व गोष्टी आपण अनुभवल्या. त्याचा अनुभव असल्यामुळे आपण यंदाही या वाढत्या रुग्णसंख्येवर यशस्वीरित्या मात करु असे वाटते. फक्त स्वयंशिस्तीची गरज आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे या सर्व गोष्टी स्वयंशिस्तीत येतात. या गोष्टी जर प्रत्येक नागरिकाने पाळल्या तर या व्हायरसची निश्चितच कमी होईल.भारतात सुमारे १४० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. ही जनता कोरोनापासून बर्‍याच अंशी सुरक्षित आहे. या लोकांना कोरोना झाला तरी तो सौम्य प्रमाणात असतो व त्यामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते. ताप आल्यावर औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे व कितीही महत्त्वाचे काम असले तरी घराबाहेर पडू नये, शक्य असल्यास चार ते पाच दिवस घरी आराम करावा. या दरम्यान जर ताप उतरत नसल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करुन घ्याव्या. कोरोना चाचणी‘पॉझिटिव्ह’ आली तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. गुंतागुंतीची लक्षणे नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेता येतील. अगदी रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली तरी सध्या बेडचा किवा ऑक्सिजनचा तुटवडा नाही. आपल्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील या आजारातील गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार करण्याचा आता पावणे दोन वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे कोरोना मृत्यू दर फार कमी झाला आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात काही दिवस कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती.



राष्ट्रीय लसीकरण : जेव्हा देशातील १३० कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण होईल तेव्हा आपण सर्व कोरोनामुळे सुरक्षित होऊ शकू. आपले, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण काही कारणांमुळे राहिले असेल, तर ते लवकर पूर्ण करा. ते एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. तसेच आपले सहकारी, कर्मचारी, नातलग, शेजारी यांचे लसीकरण राहिले असेल, तर त्यांना लस घेण्यास विनंती करा. अनेक सेवाभावी संस्थांनी या लसी अल्प दरात उपलब्ध केल्या व शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमास हातभार लावला.‘ओमिक्रॉन’चा झपाट्याने होणारा प्रसार : ‘ओमिक्रॉन’चा प्रसार हा कोरोना ‘व्हायरस’च्या ५०० पट जास्त झपाट्याने होते, असे सांगून घबराट निर्माण करण्यात येते परंतु, या गोष्टींची अवास्तव भीती ठेवण्याची गरज नाही. आज भारतात तीन कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, तर १४० कोटी डोसचे लसीकरण झाले आहे. यामुळे तिसरी लाट झपाट्याने पसरण्याची शक्यता कमी आहे. लसीकरण आणखी झपाट्याने वाढविले, तर ही शक्यता आणखी कमी होऊन जाईल. ‘ओमिक्रॉन’चा प्रसार जरी झपाट्याने होत असला तरी त्याची दाहकता कमी आहे. त्यामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेची अवास्तव भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यासाठी स्वयंशिस्तीची जरुर आहे व ही स्वयंशिस्त सर्व १३० कोटी नागरिकांना पाळण्याची गरज आहे.




मन की बात : नियमितपणे पंतप्रधानांचा होणारा संवाद ’मन की बात’ हा कोरोना काळात आशेचा किरण होता. देशातील सर्व नागरिकांना पंतप्रधानांतर्फे धीर दिला जात होता. त्यात आत्मियता होती. कोरोनावर मात करण्यासाठी होणार्‍या प्रयत्नांची चर्चा होती, असे कार्यक्रम वेगवेगळ्या स्तरावर अनेक मान्यवरांकडून व्हावे की, जेणेकरुन आरोग्य लोकशिक्षण प्रभावीपणे होऊ शकेल.आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मर्यादा : आधुनिक वैद्यकशास्त्राचा जन्म सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी झाला. या वैद्यकशास्त्राने झपाट्याने प्रगती केली आणि मनुष्याचे जगणे सुसह्य केले, असे असले तरी सृष्टी आणि मनुष्य प्रजातीची निर्मिती ही एका योजनेनुसार झाली आहे. ‘व्हायरस’मध्ये जसे ‘म्युटेशन’ व बदल घडत असतात तसे ते मानव प्रजातीत देखील होत असतात. या बदलाबद्दल संशोधन करताना आधुनिक वैद्यकशास्त्र दिसत नाही. आजार झाल्यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक औषधे आहेत. पण, आजार होऊ नये म्हणून लस सोडल्यास विशेष प्रतिबंधात्मक उपाय नाहीत. उलट या गोष्टींचा विचार आयुर्वेदव ‘होमियोपॅथी’मध्ये आढळतो. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यदायी वातावरण, शुद्ध हवेचा व पाण्याचा मुबलक पुरवठा, खेळ, करमणूक, योग्य आहार आणि योग्य विहार याबद्दल मार्गदर्शन येथे आढळते. कोरोनावर आधुनिक उपाय करताना जीवनशैलीतील बदल, ऋतूमानाप्रमाणे आहारातील बदल, भक्तिमार्ग, व्यायाम, ध्यान धारणा यांची देखील नितांत आवश्यकता आहे.


 
 
भविष्यात खासगी डॉक्टर्स व सरकारी डॉक्टर यामध्ये सुसंवादाची नितांत गरज आहे. तसेच अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमियोपॅथी यांचा आजाराच्या लक्षणांप्रमाणे आरोग्य व्यवस्थेचा योग्य वापर व्हावा, ही अपेक्षा.

या पृथ्वीवरील ७०० कोटी जनता कोरोनामुक्त होवो, ही सदिच्छा!
 
 
 
 डॉ. मिलिंद शेजवळ


 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121