पाणीटंचाईच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा

    02-Jan-2022
Total Views | 72

Panitanchai
 
 
 
उल्हासनगर : उल्हासनगर-३ येथील ‘सपना गार्डन’ परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात मनपाच्या पाणीपुरवठा विभागास वारंवार तक्रार करूनदेखील त्याची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप नगरसेवक मनोज लासी यांनी नुकताच केला. सदर पाणीसमस्येबाबत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ५ जानेवारीपासून ‘सपना गार्डन’ परिसरामध्ये स्थानिकांच्यामार्फत आमरण उपोषण करण्यात येईल, असे लेखी निवेदनाद्वारे इशारा मनोज लासी यांनी दिला आहे.
 
 
‘सपना गार्डन’ येथे पॅनेल क्र. ९च्या ‘सपना गार्डन कॉम्प्लेक्स’, ‘न्यू लिंक रोड’, ‘अमन टॉकीज चौक’, ‘रतन दीप’, ‘रतन पॅलेस’, ‘सपना पार्क’, ‘धरम पॅलेस’, ‘गोल्डन टॉवर’, ‘हरिद्वार’, ‘हिरा सोसायटी’, ‘बशाराम अपार्टमेंट’, ‘विष्णू दर्शन’, ’जयशंकर अपार्टमेंट’, ‘शिवशक्ती कॉलनी’ आणि ’लिंक रोड’च्या लगतचा परिसरात तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, केवळ १५ ते २० मिनिटे पाणीपुरवठा होणे, अशा अडचणींचा सामना गेल्या सात- आठ महिन्यांपासून करावा लागत आहे. यामुळे नागरिक नाईलाजाने पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत असल्याचे मनोज लासी यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.
 
 
या संदर्भात मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असता बाल्कनजी बारी ते ‘सपना गार्डन’ दरम्यान मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मनपा प्रशासन व ठेकेदार यांच्यात ताळमेळ नसल्याने हे काम चार महिन्यांपासून रखडल्याची माहिती लासी यांनी दिली. मनपाचे पाणीपुरवठा अधिकारी किशोर रहेजा यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, “‘सपना गार्डन’ परिसरामध्ये सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू असून, लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम रखडले असल्याबाबत करण्यात आलेले आरोप त्यांनी नाकारले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121