प्रतीक्षेचा वनवास संपुष्टात; समस्यांचा कधी?

उड्डाणपुलावरून श्रेयवाद करणार्‍या सत्ताधार्‍यांना कळवावासीयांचा सवाल

    17-Jan-2022
Total Views | 110

Kharegaon Bridge
 
 
ठाणे : कळवा येथील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान श्रेयवादाचे राजकारण करणार्‍या मंत्र्यांना कळवावासीयांकडून विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत. खारेगाव उड्डाणपुलासाठी १४ वर्षांच्या प्रतीक्षेचा वनवास संपला असला तरी येथील समस्यांचा वनवास कधी संपुष्टात येणार, असा सवाल कळव्यातील नागरिक सत्ताधार्‍यांना विचारत आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल होण्यासाठी तब्बल १४ हून अधिक वर्षांची प्रतीक्षा करावी लागल्याचे कळवावासीयांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलाच्या गैरसोयीअभावी कळव्यातील सर्वसामान्य नागरिकांनी वर्षानुवर्षे अनेक हालअपेष्टा सोसल्या. रेल्वे रूळ ओलांडताना येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे, वाहनांतून प्रवास करताना रेल्वे फाटक उघडण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा, यामध्ये वाया जाणारा वेळ आणि या ठिकाणी होणारी मोठी वाहतूक कोंडी अशा अनेक कारणांनी इथले नागरिक त्रस्त होते. वर्षानुवर्षे नागरिकांनी याठिकाणी प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. त्याचे कुणाला काही नाही.
 
 
 
परंतु, उड्डाणपुलाच्या उद्घाटनादरम्यान सत्ताभागीदारी पक्षांचे मंत्री केवळ श्रेय घेण्यातच रंगले. या पुलाचे लोकार्पण झालेले असले, तरी येथे पथदिव्यांच्या सुविधांचा अभाव होता. परंतु, यावर टीका होवू लागताच रविवार, दि. १६ जानेवारी रोजी या पुलावर ३५ ‘एलईडी’ दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. काही ठिकाणी रस्ताही खडबडीत झालेला असून, अनेक ठिकाणी रॉड तुटुन पडलेल्या अवस्थेत दिसत आहे. विविध समस्या असल्या तरी या पुलाच्या लोकार्पणाचा घाट घालण्यात आला. आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून सत्ताधार्‍यांनी या पुलाचे लोकार्पण केले. परंतु, याठिकाणी समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रतीक्षेचा वनवास संपला असला तरी, प्रत्यक्षात समस्या कधी संपुष्टात येणार, असा सवाल कळवावासीय विचारत आहेत. १४ वर्षे घेऊनसुद्धा असा पूल नागरिकांच्या सेवेसाठी बांधणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याची कैफियत नागरिक मांडत आहेत. केवळ उड्डाणपुलाचाच नव्हे तर वीज, पाणी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असून, या समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी कधी पुढाकार घेणार, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
मनस्तापात आणखीन भर
कळवा पूर्वेला जाण्यासाठी याआधी रेल्वे फाटकाचा पर्याय होता. त्यावेळी प्रवाशांना १०० मी. अंतर मोजावे लागत होते. मात्र, या नव्या उड्डाणपुलामुळे तब्बल ४५० मी. अंतर मोजावे लागणार आहे. यावरून कळवा पूर्वेला रेल्वे फाटकालगत असणार्‍या रहिवाशांचा चांगलाच मनस्ताप होणार आहे हे निश्चित. त्याचप्रमाणे पुलावरून पश्चिमेकडे आल्यास खारेगावच्या दिशेने जाणारी मार्गिका दिली नसल्याने प्रवाशांना मोठा ‘युटर्न’ घ्यावा लागत आहे.
 
 
 
पूल बांधायला प्रशासनाला १४ वर्षं का लागतात?
मोठमोठे प्रकल्प पाच ते दहा वर्षांत पूर्ण होतात. येथे केवळ एक पूल उभारण्यासाठी इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागली. रेल्वे प्रशासनाने गर्डर टाकून त्याच्या देखभालीची वेळ आली तरी पुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. रेल्वेकडून काही महिन्यांमध्ये गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. मग, उरलेला पूल बांधायला प्रशासनाला १४ वर्षं का लागतात? यावरून कोणाकडून पूल बांधणीस इतका उशीर झाला, हे निश्चित दिसून येते.
- उदय जोगळेकर, स्थानिक नागरिक, कळवा
 
 
 
कळवा नाका परिसरात ठाण्याला जोडणारा पूल पूर्ण होण्यास किती वर्षांचा वनवास भोगावा लागेल?
निवडणुका जवळ आल्या की, आम्ही अनेक सुविधा उपलब्ध करून देऊ, कोणतीच गैरसोय होणार नाही, याकडे आम्ही लक्ष देऊ, अशी अनेक आश्वासने राजकारण्यांकडून दिली जातात. हेच आश्वासन देऊन बांधायला घेतलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास १४ वर्षं का लागतात? वर्षानुवर्षे होणारी नागरिकांची गैरसोय सत्ताधार्‍यांना दिसत नाही का? निवडणुका जवळ येताच पुलाच्या लोकार्पणाची घाई का? खारेगाव उड्डाणपुलासाठी १४ वर्षांचा वनवास; मग कळवा नाका परिसरात ठाण्याला जोडणारा पूल पूर्ण होण्यास किती वर्षांचा वनवास भोगावा लागेल?
- रोहित सांबरे, स्थानिक नागरिक, कळवा
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121