चरैवेति चरैवेति...!

    15-Jan-2022
Total Views | 78

spirituality

सारे जग झपाट्याने पुढे वाटचाल करीत आहे. कारण, गतिशीलता हा प्रत्येकाचा स्थायी गुणधर्म होय. किंबहुना, हे सारे जगच चलायमान आहे. जिकडे पाहाल तिकडे सर्वांचे येणे-जाणे चालूच आहे. येथे कोणीही थांबलेला नाही. कारण, ‘थांबला तो संपला’ किंवा ‘आराम हराम आहे’ या म्हणी आम्हाला गतिशील होण्याकरिता नेहमीच प्रेरणा देत असतात. पण, अशा या परिवर्तनशील जगात आपले चालणे किंवा गतिमान होणे हे मात्र विधायक असले पाहिजे.
आस्ते भग: आसीनस्य,
उर्ध्वं तिष्ठति तिष्ठत:।
शेते निपद्यमानस्य
चरति चरतो भग:॥
चरैवेति चरैवेति॥
(शतपथ ब्राह्मण- अध्याय ३३)
अन्वयार्थ
(आसीनस्य) एके ठिकाणी बसून राहणार्‍याचे (भग:) भाग्य (आस्ते) बसते, (तिष्ठत:) एके जागी थांबणार्‍यांचे, उभे राहणार्‍यांचे (भग:) भाग्य (तिष्ठति) थांबते, उभे राहते, (निपद्यमानस्य) झोपणार्‍यांचे (भग:) भाग्य (शेते) झोपते आणि (चरत:) चालणार्‍यांचे (भग:) भाग्य (चरति) चालत राहते. म्हणून नेहमीच चालत राहा... चालत राहा...
विवेचन
कर्मनिष्ठा ही माणसाची ओळख आहे. सतत कामात व्यस्त राहणे, न थकता सतत पुढे पुढे जात राहणे, परिश्रम करणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवनाचे अंतिम उद्दिष्ट गाठणे, यासाठीच तर हा मानव देह लाभला आहे. वेदांचे अर्थ सूक्ष्मपणे विशद करणार्‍या ‘शतपथ ब्राह्मण’ या ग्रंथात आलेला हा एक प्रसंग! यात एके ठिकाणी गुरु-शिष्यांच्या संदर्भात अतिशय बोधप्रद असा संवाद आलेला आहे. रोहित नावाचा ब्रह्मचारी आपल्या आचार्यांच्या सेवेत गेला असता, जीवनाच्या सफलतेविषयी मार्गदर्शनासाठी त्याने आपल्या आचार्यांना प्रार्थना केली. तेव्हा आचार्यांनी त्यास ‘चरैवेति चरैवेति’ असा उपदेश दिला. त्यातील काही श्लोकांपैकी वरील एक श्लोक आहे. यातून भाग्य कोणाला म्हणतात, याविषयी अगदी सोप्या व सुगम शब्दांत मार्गदर्शन मिळते, जे की आजच्या काळात फारच मौलिक स्वरूपाचे भासते.
खरेतर भाग्य म्हणजे आपल्याच संचित क्रियमाण व प्रारब्ध यात तीन कर्मांचा परिपाक असतो. जसे कर्म करतो, तसे भाग्य घडते. ग्रह, राशी, आपली हस्तरेषा वगैरे यांचा भाग्याशी काही संबंध नसतो. ‘यथा कर्मं तथा फलम्’ हेच खरे होय. ‘भग् ऐश्वर्ये’ या धातूपासून बनलेल्या शब्दापासून ‘भग’ शब्दाचा ‘भाग्य’ हा भाववाचक शब्द! विष्णुपुराणात संदर्भात एक श्लोकात आला आहे-
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिया:।
ज्ञानवैराग्ययश्चैव षण्णां भग इतीरणा॥
म्हणजेच समग्र ऐश्वर्य, धर्म, यश (कीर्ती),श्री (शोभा), ज्ञान आणि वैराग्य या सहा बाबींना नाव ‘भग’ असे म्हणतात. या सहा गोष्टींना प्राप्त करण्यासाठी जो प्रयत्नशील असतो व अपार कष्ट व परिश्रमाने यांना मिळवतो, तोच खरा भाग्यवान! म्हणूनच तर वरील श्लोकात रोहित या ब्रह्मचार्याला उपदेश देताना आचार्य म्हणतात-
भाग्य आपल्या कर्मावर आधारित आहे. आपण बसलो की, भाग्यदेखील बसते. आपण आळशी बनून एके ठिकाणी उभे राहिलो किंवा थांबलो की, भाग्यदेखील उभेच राहते व थांबते. आपण झोपलो की, आपले भाग्यदेखील झोपते, तसेच चालू लागलो की, आपले भाग्यदेखील चालू लागते. यासाठी हे रोहिता, निश्चितपणे चालत राहणे, हाच मानवाचा खरा धर्म आहे.
सारे जग झपाट्याने पुढे वाटचाल करीत आहे. कारण, गतिशीलता हा प्रत्येकाचा स्थायी गुणधर्म होय. किंबहुना, हे सारे जगच चलायमान आहे. जिकडे पाहाल तिकडे सर्वांचे येणे-जाणे चालूच आहे. येथे कोणीही थांबलेला नाही. कारण, ’थांबला तो संपला’ किंवा ’आराम हराम आहे’ या म्हणी आम्हाला गतिशील होण्याकरिता नेहमीच प्रेरणा देत असतात. पण, अशा या परिवर्तनशील जगात आपले चालणे किंवा गतिमान होणे हे मात्र विधायक असले पाहिजे. गमनागमनाच्या चक्रातून तर सर्वजणच मार्गक्रमण करताना दिसतात, पण यशस्वी वाटचाल तर त्याचीच खरी, ज्याने सत्यपंथ अवलंबिला!
’जग’ हा शब्द ‘गम्’ (गच्छ्) या धातूपासून बनला आहे. ’गच्छति इति जगत्’ म्हणजेच जे सतत पुढे जात राहते ते जग! या सबंध जगात चेतन व जड ही दोन्ही तत्त्वे उत्पत्ती, स्थिती व लय या चक्रातून वाटचाल करतात. आईच्या उदरात प्रवेश करताच बाळाच्या हालचालींचा श्रीगणेशा होतो. नंतर या बाह्य रंगीबेरंगी दुनियेत येताच तो शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रगतीच्या पथावर आरूढ होतो. रडणे, हसणे, हातपाय हलवणे, पोटावर सरकणे या क्रिया करता करता तो बसण्याचा व उभे टाकण्याचा प्रयत्न करतो. एके दिवशी जेव्हा तो पहिलेवहिले पाऊल टाकतो, तेव्हा आई-वडील व कुटुंबीयांच्या आनंदाला उधाण येते. पुढे चालणे, धावणे, खेळणे या बाबी होता होता त्याच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाची वाटचाल सुरूच राहते. अशी ही जीवनाची ’वाट’ आणि ’चाल’ ज्याची चांगली असली की तो सफल ठरलाच समजा!
जीवनाच्या कर्तव्यपथावरुन चालताना वाटेतच थांबण्याकरिता अनेक प्रलोभने येऊ शकतात. कोणी रोखण्याचाही प्रयत्न करेल. पण, अजिबात थांबायचे नसते. यासाठीच तर शास्त्रात ‘चरैवेति चरैवेति’ हा उपदेश मिळतो. ‘चर एव इति...’ म्हणजे चालतच राहा, अजिबात न थांबता सतत पुढे सरसावत राहा. जन्मोजन्मीचे आपले हे विचरण स्वस्तिपंथावरचे असावे. त्यासाठी प्रवासी धैर्यवान असावा. मार्गही चांगला हवा आणि ध्येय पण उदात्त व पवित्र हवे. सोबतच चालण्याची गति व दिशादेखील एकसारखीच असली पाहिजे. चालणे हे मानवतेच्या पवित्र मार्गावरचे असले की, ते स्वतःपुरते मर्यादित न राहता वैश्विक कल्याण साधणारे ठरते.
थोर ऋषिमुनी, संत-महात्मे ज्या मार्गाने गेले त्याचे अनुसरण करणे म्हणजेच आपल्या गतिशील जीवनाची सार्थकता; अन्यथा अनिष्ट मार्ग तो काय कामाचा? सुजनांचे चालणे हे सत्य व पवित्र मार्गावरचे, सामान्यांचे गतानुगतिक, तर दुर्जनांचे मात्र नेमके अगदी याउलटच! विचरणे कसे? तर सूर्य आणि चंद्राप्रमाणे न थांबणारे. सर्वांना नवजीवन प्रदान करणारे आणि जगाचे कल्याण साधणारे. म्हणूनच तर वेदसूक्तातील ‘स्वस्तिपन्थाम् अनुचरेम सूर्याचंद्रमसाविव।’ ही उदात्त भावना सर्वांचे जीवन सर्वार्थाने उन्नत होण्यास प्रेरित करते.
गमू पंथ सूर्यचंद्रवत् कल्याणाचा
वाढवू जगती नित्य धर्म मानवाचा...




प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121