कणकवली : सिंधुदुर्गातील देवगड नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हा मोठा धक्का आहे, त्यांच्या दौऱ्यानंतर नगरसेवक फुटल्यामुळे राणेंचे राजकीय वजन कमी होईल, असेही शिवसेना नगरसेवकांनी म्हटले होते. मात्र, हे नगरसेवक कधीही भाजपत नव्हतेच असा दावा नीतेश राणेंनी करत पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे.
"आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा", अशी टीका नाव न घेता नीतेश राणेंनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकुर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा धक्का आहे, असा दावा शिवसैनिकांनी केला. विशेष म्हणजे या प्रवेशाला राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मुहूर्त मिळाला. जन आशीर्वाद यात्रेनंतरही राणेंच्या भाजपला गळती, असा संदेश शिवसेनेने देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, नीतेश राणेंनी या प्रवेशाची हवाच काढून घेतली आहे. देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाला पक्षप्रवेश असे नाव देण्यात आल्याने राणेनी शिवसेनेला टोला लगावला आहे.