मुंबई : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सचिव दिव्या ढोले यांनी कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागलेल्या अडचणींवर केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. दरम्यान, “मुंबई महापालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागाने शहरातील नागरी आणि अनुदानित शाळांना जी मुलं खासगी शाळा सोडून इयत्ता पहिली ते दहावीच्या प्रवेशासाठी सरकारी शाळांमध्ये येत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण सोडण्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नसले, तरीही नागरी व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत,“ असे दिव्या ढोले यांनी म्हटले आहे.
“शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जन्मपत्र दाखला दाखवून सरकारी, महानगरपालिका, अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा, तसेच खासगी शाळेचे शुल्क न भरू शकल्याने काही खासगी शाळांमार्फत अशा विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यावर शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणून या मुलांची काळजी घेतली पाहिजे,” अशी मागणीही दिव्या ढोले यांनी राज्य सरकारकडे केली होती.