शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असणार्या आरोपींवरील आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू
मुंबई : शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या १५आरोपींवरील आरोपनिश्चितीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवार, दि. २३ ऑगस्ट रोजी विविध गंभीर आरोपांसह १७ आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला. या मसुद्यावर विशेष न्यायालय लवकरच सुनावणी घेणार असून, त्यानंतर आरोपनिश्चिती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी सुधा भारद्वाज, वेर्णन गोन्साल्विस, वरवरा राव, हानी बाबू, प्रा. आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा यांच्यासह एकूण १५ जण अटकेत आहेत. या सर्वांविरोधात ‘एनआयए’ने आरोपांचा मसुदा सादर केला आहे. त्यात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) दहशतवादाच्या गंभीर आरोपांसह विविध कलमांअतर्गत आरोपांचा समावेश आहे.
भीमा-कोरेगाव येथे उसळलेली दंगल आणि यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप असणारी ‘एल्गार परिषद’ या दोन्हींच्या प्रकरणातील आरोपींनी देशात हिंसा घडवून आणण्यासाठी भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची निवड केल्याचा कथित आरोप आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित ‘एल्गार परिषद’ प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये ‘एनआयए’ने दिल्लीच्या ‘जेएनयु’ तसेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (टीआयएसएस) विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमले होते, असे म्हटले आहे.