मुंबई: राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्री पदाचे वेध लागल्याचे कळते आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीनचिट दिल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले. त्यानंतर संजय राठोडांच्या मंत्रिपदाच्या चर्चा सुरु आहे. जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असे विधान केल्याने पुन्हा एकदा राठोड यांच्या मंत्रिमंडळात परतण्याच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून येते आहे. मात्र विरोधकांचा संजय राठोड यांच्या नावाला तीव्र विरोध आहे.
राठोड सद्या खानदेश दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे बोलताना राठोड म्हणाले, "माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. आपल्या समाज्याच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. तांड्यावर जावून समाज बांधवांशी चर्चा करीत आहोत. त्यांना काय हवं नको, ते मी सध्या पाहत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझ्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही राठोड म्हणाले. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “याबाबत आपण एकदा बोललो आहोत. प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. योग्य वेळ येईल तेव्हा मी निश्तितपणे बोलेल.”असेही राठोड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राठोड मंत्री पदासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही आहेत का? अशाही चर्चा सुरु आहेत.
वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना आमदार संजय राठोड यांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण आरोप झाल्यानंतर गेले कित्येक दिवस नॉट रिचेबल असणारे संजय राठोड आता पुन्हा विविध भागांचा दौरा करत आहे. त्यामुळे याच दरम्यान शिवसेनेच्या गोटातही त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे.