असत्य खोडावे, सत्य सांगावे...

    04-Jun-2021
Total Views | 375

agralekh_1  H x


अमेरिका आणि ब्रिटनच्या काही आंतरराष्ट्रीय माध्यमांचे भारतातील ‘कोविड’ महामारीचे अतिरंजित चित्रण हे असत्यावरच बेतलेले होते. पण, अशा या पूर्वग्रहदूषित असत्याच्या प्रयोगांना आता सत्यास्त्राचा वापर करून खोडण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात भारताची प्रतिमा मुद्दाम मलीन करणार्‍या या कांगावखोर माध्यमांच्या अरेरावीला चाप बसेल.


शंभर शब्दांपेक्षा एकाच छायाचित्रातून दिला जाणारा तोच संदेश अत्यंत प्रभावी ठरतो, असा माध्यमशास्त्रातील एक सुपरिचित नियम. पण, हाच नियम ऐन महामारीच्या संकटकाळात भारतविरोधी नकारात्मकता आणि द्वेषपेरणीसाठी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सर्रास वापरला. भारताच्या स्मशानभूमीतील जळत्या चितांचे मोठाले छायाचित्र ‘न्यूयॉर्क टाईम्स’सारख्या अमेरिकन दैनिकाने आपल्या पहिल्या पानावर कुठल्याही प्रयोजनाशिवाय छापले. ‘अटलांटिक’ नावाच्या अशाच एका आंतरराष्ट्रीय मासिकाने तर चक्क भारतीय ध्वजातील अशोकचक्राच्या जागी कोरोनाच्या निळ्या रंगाच्या विषाणूला चिकटवून समस्त भारतीयांचाच अपमान केला. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तर कॅमेरे बगलेत घेत भारतीय रुग्णालयांमध्ये थेट घुसखोरी करून रुग्णांच्या अश्रूआक्रोशावर ‘टीआरपी’ कमाविण्याचा सपाटा लावला.

भारतात कोरोनाच्या खर्‍या आकडेवारीची सरकार लपवाछपवी करत असल्याचे तर्कहीन, तथ्यहीन असे बिनबुडाचे आरोपही या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी कोणत्याही पुराव्यांशिवाय केले. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा संतापजनक प्रकार केला गेला तो केवळ भारताला कमी लेखण्यासाठी आणि मोदीद्वेषापायी. भारताची विकासोन्मुख जागतिक प्रतिमा मलीन करण्याचे हे एक पद्धतशीर आंतरराष्ट्रीय षड्यंत्र राबविले गेले आणि दुर्दैवाने आपल्याच देशातील पुरोगामी, मोदीद्वेष्ट्या पत्रकारांनी, राजकीय पक्षांनी या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला वेळोवेळी खतपाणीही घातले. ‘पाश्चात्त्यांचे सगळेच ते गोड, आपले ते कडू’ या प्रचलित गैरसमजातून भारतातही मोदींविरोधात जनआक्रोषाची लाट निर्माण करण्याचे अयशस्वी प्रयत्न करण्यात आले. अशा या डाव्यांच्या खुंटीला टांगलेल्या आंतरराष्ट्रीय माध्यमांचा ‘कोरोना आवडे गिधाडांना’ आणि ‘सरणावर टपलेली गिधाडे’ या आमच्या यापूर्वीच्या संपादकीयांतूनही आम्ही पदार्फाश केला होताच. परंतु, आता केंद्रातील मोदी सरकारनेही या आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भांडाफोड करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत आणि त्याचे तसे परिणामही दिसू लागले आहेत.

केंद्र सरकारने या उद्दाम आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्रितपणे एक व्यवस्था कार्यान्वित केली आहे. त्याअंतर्गत संबंधित देशांच्या राजदूतांना खरी माहिती पाठविणे आणि त्यांनी संबंधित प्रसारमाध्यमांना त्याची जाणीव करून देणे याचा समावेश आहे. तसेच भारतीय राजदूतांना त्या-त्या देशांमधील प्रसारमाध्यमांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांना भारतातील कोरोनाच्या सत्य परिस्थितीविषयी माहिती आता देण्यात येईल. या यंत्रणेची अंमलबजावणी केंद्र सरकारने सुरूही केली असून, त्याचे सकारात्मक परिणामही समोर आले. अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या माहितीची योग्य ती दखल घेतली, तर बहुतांशी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या अतिरंजित आणि असत्य वार्तांकनाला पूर्णविराम लावला. काही माध्यमांनी भारतातील ‘कोविड’ परिस्थितीविषयी दिशाभूल करणारे यापूर्वी केलेले ट्विटही हटविले.

पण, केवळ सरकारी पातळीवर नाही, तर भाजपच्या परराष्ट्र विषयक विभागानेही याकामी पुढाकार घेतलेला दिसतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे, आगामी काळात असल्या आंतरराष्ट्रीय बदनामीच्या षड्यंत्राची नांगी वेळीच ठेचता येईल. यापूर्वी जेव्हा-जेव्हा भारताला, केंद्र सरकारला अशाप्रकारे अपकीर्ती आणण्यासाठी असे खेळ खेळले गेले, तेव्हा याकडे आधीच्या सरकारांनी फारसे गांभीर्याने लक्षही दिले नाही. भारताची ही बदनामी रोखण्यासाठी आपणही काही स्वतंत्र यंत्रणा विकसित करू शकतो, याची साधी गरजही या सरकारांना वाटू नये, याचेच मुळी आश्चर्य वाटते. परंतु, मोदी सरकारने या घटनांना अतिशय गांभीर्याने घेऊन भारताची प्रतिमा धुळीस मिळवण्याच्या या षड्यंत्रांच्या मुसक्या आवळण्याचाच विडा उचललेला दिसतो. कारण, इथे प्रश्न केवळ अमूक एक सरकारचा आणि पंतप्रधानांचाच नव्हे, तर समस्त भारताचा, भारतीयांच्या मानसन्मानाचाही आहे.

खरंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांतून होणारा हा भारतविरोधी खोडसाळपणा वर्षानुवर्षं चालत आलेला. आपल्याला आठवत असेल की, ‘मंगळयान’ प्रक्षेपणाच्या वेळीही ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने एक कार्टुन प्रकाशित करून भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. त्या कार्टुनमध्ये ‘एलिट स्पेस क्लब’ असे लिहिलेल्या दरवाजाच्या आत दोन विदेशी गृहस्थ भारतातील मंगळमोहिमेची बातमी वृत्तपत्रात वाचताना एकीकडे दाखविले होते, तर त्यांच्या दारात एक भारतीय शेतकरी आपल्या गाईसह दरवाजा ठोठावतोय, अशा आशयाचे ते कार्टुन होते. साहजिकच हे कार्टुन भारताच्या अंतराळ क्षमतेला तुच्छ लेखणारे आणि पाश्चात्त्यांच्या मदतीशिवाय भारत ही मोहीम कशी राबवूच शकत नाही, असा अहंकार दर्शविणारे होते. पण, या कार्टुनवर सर्वच स्तरातून कठोर टीका होताच, शेवटी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ला भारतीयांची सपशेल माफी मागावी लागली होती. त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमधल्या काही माध्यमांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन दशकानुदशके असाच पूर्वग्रहदूषित दिसून येतो. त्यांच्यादृष्टीने भारत हा अजूनही खेडवळ, गारुडी आणि मदार्‍यांचा देश आहे आणि तिथे रस्त्यांवरून अजूनही साप आणि हत्तीच फिरत असतात. याच कलूषित मनोवृत्तीसह माध्यमांच्या ‘कव्हरेज’मधून भारताला सर्वार्थाने कमी लेखण्याचा प्रयत्न अगदी राजरोसपणे केला जातो. केवळ विकासात्मक तफावतींवरूनच नव्हे, तर एकप्रकारे वंशवाद आणि उच्चवर्णवादी अहमगंडही या माध्यमांच्या वार्तांकनाच्या अगदी नसानसांत भिनलेला आहे. दुर्दैव हेच की, अमेरिका, ब्रिटन हे देश त्यांच्या वसाहतवादी मानसिकतेतून बर्‍यापैकी बाहेर आले असले, तरी या देशातील काही माध्यमांना मात्र भारत आणि एकूणच ‘थर्ड वर्ल्ड कंट्रीस’ अजूनही ‘थर्ड ग्रेड’ वाटतात.

आज गुगलपासून अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय विराजमान आहेत. इतकेच काय खुद्द अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे राजकारण असो वा क्रीडा, किंवा अन्य कुठलेही क्षेत्र, भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्वच क्षेत्रात जगभरात उमटवला असून स्वत:ला वेळोवेळी विविध कसोट्यांवर सिद्धही केले आहे. भारत हा आज कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. लसनिर्मितीच्या बाबतीतही भारताने विकसित देशांप्रमाणेच आघाडी घेत अनेक देशांना या स्पर्धेत मागेही टाकले. कोरोनाच्या संकटाचाही भारत अगदी नेटाने सामना करतोय. अमेरिका, ब्रिटन आणि इतर विकसित युरोपीय देशांची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या लाटेने कशी कोलमडली आणि तेव्हाही १३० कोटी लोकसंख्येचा हा भारत देश मोदींच्या कणखर नेतृत्वात कसा सावरला, सुरक्षित राहिला, हे अख्ख्या जगाने पाहिलेच. पण, या आंतरराष्ट्रीय माध्यमांचे कॅमेरे या विकसित देशांच्या रुग्णालयात ‘प्रायव्हसी’मुळे साधे डोकावूही शकले नाहीत. पण, ज्या भारतात अंत्यसंस्काराचे विधी स्मशानभूमीत, नदीकाठी असे मोकळ्या जागेत पार पाडले जातात, तिथे ही मंडळी मात्र अक्षरश: गिधाडासारखी तुटून पडली. कुंभमेळ्यातून कोरोनाच्या प्रसाराचाही या माध्यमांनी उगाच बाऊ केला.


पण, आजही कोरोनाचा विषाणू तुमच्या देशात सर्वप्रथम आलाच कसा, असा परखड प्रश्न चीनला विचारण्यासाठी मात्र ही माध्यमे आपली लेखणी आखडती घेतात. ‘सीएए’, ‘एनआरसी’, शाहीनबागचे आंदोलन, ‘कलम ३७०’चे रद्दीकरण या भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्येही अशाचप्रकारे नाक खुपसून मोदी सरकार कसे अल्पसंख्याकविरोधी, फॅसिस्टशाहीचे प्रवर्तक आहे वगैरे लेख या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दैनिकांनी सत्य परिस्थितीकडे कानाडोळा करत खरडले. यांचा उद्देश एकच की, मोदी सरकारविरोधात भारतात आणि जागतिक पातळीवरही जोमाने नकारात्मक प्रचार करायचा. तेव्हा, आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील हा एकूणच पक्षपातीपणा, दुटप्पीपणा आणि यांची ही फुकटची ‘साहेबगिरी’ चव्हाट्यावर आणायलाच हवी.यादृष्टीने मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्वी स्वागतच करायला हवे. कारण, आजचा जमाना हा प्रतिमेच्या खेळाचाच आहे आणि भारताच्या प्रतिमेवर अशाप्रकारे ऊठसूठ कुणी चिखलफेक करणार असेल, तर सत्यकथन करून त्यांचा हा खोटेपणा पुराव्यांनिशी असा मुळापासून खोडूनच काढला पाहिजे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121