मुंबई : तौक्ते चक्रीवादळात वरळीतील ४५ वर्षीय महिलेचा अंगावर झाड पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घटना घडली. मात्र घटनेच्या ३ दिवसांनंतरही वरळीच्या आमदार किंवा भागातील नगरसेवक कोणीही मृत महिलेच्या कुटुंबीयांकडे अद्यापपर्यंत फिरकलेच नाहीत. यावरून भाजप नेते निलेश राणेंनी उद्दिग्न प्रतिक्रिया देत वरळी विधानसभा आमदार मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबई व महानगर परिसरातील अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले. अनेक मोठ्या दुर्घटनाही याकाळात घडल्या. त्यापैकीच एक घटना वरळीतील बीडीडी चाल परिसरात घडली. घरकाम करणाऱ्या एका ४५ वर्षीय महिला संगीता खरात यांच्या अंगावर वडाचे वृक्ष उन्मुल पडल्याने या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला २ दिवस उलटून जाऊनही या मृत महिलेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी तसेच कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे किंवा स्थानिक नगरसेवक कोणीही या कुटुंबीयांकडे फिरकलेच नाही. यामुळेच वरळीकरांना वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तर वरळीकरांना सल्ला देत राणे म्हणतात, " ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला तरी शिव्या घालतायत म्हणून मतदान करताना विचार करून केला पाहिजे नाहीतर असा मनस्ताप होतो.", असा खोचक टोला राणेंनी लगावला.