मुंबई : केंद्र सरकार संविधानिक व्यवस्था न मानणारी आणि लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असून भाजपचा हा चेहरा समोर आला आहे असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. मात्र पटोलेंच्या या वक्तव्याचा भाजपने 'काँग्रेसला पक्ष लोकशाही पद्धतीनं चालवता येतो का ?' असा सवाल करत समाचार घेतला आहे.
भाजप माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणतात, नाना पटोलेजी संविधानाने चारही स्तंभांचे कार्य ठरविले असल्याने एकाने दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये हे सांगणे देखील त्या त्या स्तंभांचे कर्तव्यच असते. देशात आणीबाणी लावणाऱ्यांनी, शिखांचे शिरकाण करणाऱ्यांनी, शहाबानो निकाल फिरवणाऱ्यांनी हे आम्हाला शिकवण्याचा उद्योग बंद करावा. तुम्हाला साधा तुमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालविता येतो का ? हे आधी तपासावे!" असा थेट सवाल करत यांनी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान पटोले यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले होते की, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटे ऍफेडेव्हिट दाखल केले. सर्वोच्च न्यायालय तज्ज्ञ नसून कोविडच्या परिस्थितीत त्यांनी हस्तक्षेप करू नये. हे लोकशाहीच्या व्यवस्थेला संपुष्टात आणण्याचा भाजपचा चेहरा यामुळे समोर आला आहे असेही पटोले म्हणाले. संविधानात न्याय व्यवस्थेला आत्मा समजलेले आहे. या आत्म्याला न मानणारी केंद्रातील व्यवस्था असं चित्र सध्या स्पष्ट झाले आहे.