कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने घेतला निर्णय
मुंबई: राज्य शासनाने कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता 'मिशन बिगीन' अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व सरकारी आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे. नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेदेखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे.