राज ठाकरेंनी पहिल्यांदाच स्पष्ट केली ही भूमिका
नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अदानी इलेक्ट्रीसिटीचे मालक गौतम अदानी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विजबिल दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला गेल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. नवी मुंबई दौऱ्यावर असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनसेने सुरुवातीपासूनच विजबिल दरवाढ प्रश्न लावून धरला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.
अदानींनी घेतली होती पवारांची भेट
राज्यपाल कोश्यारी यांनी या संदर्भात पवारांना पत्र लिहीण्याची सूचना ठाकरेंना केली होती. आता त्यानंतर पवारांना आपण स्वतः फोन केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकारानंतर पुढील काही दिवसांतच सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी अदानी स्वतः येऊन गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विजबिल दरवाढ माफ करण्याचा निर्णय रखडला, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचेही तेच होणार !
हे सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकणारे नाही. त्यामुळे यांच्या आंदोलने किंवा घोषणांमधून काहीही साध्य होणार नाही, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारविरोधात पेट्रोल दरवाढीवरून आवाज उठवला होता. केंद्र आणि राज्यांतील या लढाईतून कुणाला काहीही मिळणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दोघेही राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकरी आंदोलन विनाकारण ताणले
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी विधेयकांविरोधातील आंदोलनाबद्दल मनसेची भूमिका काय, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर हा प्रश्न केंद्र आणि शेतकरी उगीचच ताणत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.