
अर्थमंत्री, पेट्रोलियम मंत्र्यानंतर आता खुद्द गव्हर्नर इंधनदर कपातीसाठी देतायेत सल्ला
नवी दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. देशभरात इंधन दरवाढीवरून होणारी चर्चा काही माविन नाही. परंतु, आतापर्यंत या दर वाढीवर फक्त सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला होता. पण आता सरकारमधून देखील पेट्रोल-डिझेल दर वाढीला विरोध होत आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनीं टॅक्समध्ये घट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे.
'आरबीआय मॉनिटरी पॉलिसी'च्या मिनट्समध्ये शक्तीकांता दास यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला इनडायरेक्ट टॅक्समध्ये कपात करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. टॅक्समध्ये कपात केल्यानंतर इंधनांच्या दरात देखील घसरण होईल असंसुद्धा ते म्हणाले.
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या इनडायरेक्ट टॅक्समुळे आवश्यक वस्तूंवरील दर वाढले आहेत. ज्यामध्ये दळणवळण आणि आरोग्य सेवेचा देखील समावेश आहे. दरम्यान पेट्रोलचे दर वाढल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास देखील महागला आहे. किमान आता खुद्द गव्हर्नर सांगतायेत म्हणून तरी सरकार या सामान्य माणसाच्या समस्या गांभीर्याने घेणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.