मुंबई : नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने संघात अनेक बदल केले. विशेष म्हणजे, विराट कोहलीकडून टी २०नंतर एकदिवसीय संघाचेदेखील कर्णधारपद काढले आहे. त्याच्याऐवजी रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्णधार म्हणून व्हाईट बॉल क्रिकेटमधील त्याचा प्रवास संपल्यात जमा आहे. तर यापुढे भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाचे २०२२चा टी २० विश्वचषक आणि २०२३चा एकदिवसीय विश्वचषक हेच लक्ष असल्यचे स्पष्ट झाले आहे.
४८ तासात बदलला भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने विराट कोहलीला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. तो कर्णधार पद सोडण्यास तयार नव्हता. तरीही त्याच्या इच्छेविरोधात बीसीसीआयने त्याला कर्णधार पदावरून दूर केले. विराटने आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण २०२३च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचा कर्णधार राहू असे विराट कोहलीला वाटत होते. मात्र, बीसीसीआयने त्याला हटवून भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी रोहित शर्माला दिली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि हनुमा विहारी संघात परतले आहेत. यासोबतच रोहित शर्माला वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.