मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना तसेच अनिल परब आणि काही मंत्र्यांवर जोरदार टीका केली. माझे राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखला गेला, असा आरोप त्यांनी अनिल परब यांच्यावर केला. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, की अनिल परब? असा खोचक प्रश्नदेखील त्यांनी विचारला. कथित ऑडिओ क्लिपवरून पक्षश्रेष्ठींची नाराजी आणि त्यानंतर रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना रामदास कदम यांच्या समर्थकांना डावलल्यामुळे रामदास कदम हे नाराज असल्यची चर्चा होती. त्यानंतर पत्रकार परिषदेपूर्वी ते शिवसेनेला रामराम करतात का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, असे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, "माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट सुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आहे आणि ते किती चुकीचे आहे हे स्पष्ट दिसत असल्यानंतर माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही. त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाला हानी पोहचेल अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडलेली नाही. मी उद्धव ठाकरेंना पत्र देऊन खुलासा केला होता. दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती. या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळे नमूद केले आहे," असे रामदास कदम म्हणाले.
पालकमंत्री असूनही अनिल परब यांनी रत्नागिरीला वाऱ्यावर सोडले : रामदास कदम
"अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी सपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. अनिल परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे मी पक्षाविरोधात बोलणे असे सांगितले जाते. मिलींद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत असल्याने पाडण्यात आला. यांनी स्वतःचे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचे उद्धवस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खाजगी मालमत्तेचा शिवसेनेसोबत काय संबंध? माझ्या विरोधात दसरा मेळाव्यामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी निषेध करतो. मी आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळे माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्यापाठीमागे कोण आहे मला सगळे माहित आहे," असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
खरा गद्दार कोण? हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे : रामदास कदम
"रामदास कदमला राजकारणातून संपवण्याचा डाव शिवसेनेमधल्या काही नेत्यांचा आहे. अनिल परब यांनी वांद्रे येथून निवडून येऊन दाखवावे. तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेना नेत्याला आणि त्याच्या मुलाला संपूर्ण राजकारणातून कायमाचे संपवायचे. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून अनिल परब राष्ट्रवादीच्या नेत्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर योगेश कदमबाबत सुडाची भावना बाळगली. दोन वर्षामध्ये अनिल परब यांनी माझ्या मुलाचा एकही फोन उचलला नाही. अनिल परबांनी तिथे मनसेच्या वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठीशी घालण्याचे काम केले," असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
"स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार? असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे.