नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी असताना पुढाकार घेऊन, स्वतःच्या अधिकारात, ‘काशिविश्वनाथ धाम’ची निर्मिती करत स्वहस्ते लोकार्पणातून, स्वतः उपस्थित राहण्यातून, पवित्र गंगा नदीत डुबकी मारण्यातून देशवासियांना, हिंदुंना, हिंदुत्ववाद्यांना आता कोणी बोट उचलणार नाही, विरोध करणार नाही, अराजक माजवणार नाही, हा संदेश व मानसिक सुरक्षा दिल्याचे स्पष्ट होते.
“जुलमी सत्ताधार्यांनी वाराणसीवर अनेकदा आक्रमण केले, नगर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. मात्र, इथे औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराजदेखील उभे ठाकतात,” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अभिमानाने सोमवारी ‘काशिविश्वनाथ धाम’च्या लोकार्पणप्रसंगी केले. ‘काशिविश्वनाथ धाम’च्या लोकार्पणातून, ३५० वर्षांपूर्वी औरंगजेबाने मंदिर पाडल्यापासून मुक्तीच्या प्रतीक्षेतल्या काशिविश्वनाथाच्या गतवैभवाची पुनर्स्थापनाच नरेंद्र मोदींनी यावेळी केली. २५० वर्षांपूर्वी इंदौरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी काशिविश्वनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या महान संकल्पाचा पाया रचला. आज त्या पायावरच मोदींनी शतदिशा उजळविणारा, हिंदू-हिंदुत्ववाद्यांना स्फुरण देणारा सुवर्णकळस चढवला. परिणामी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन-मेंदूतील ‘दिव्य काशी, भव्य काशी’च्या विचाराने इतिहासाचाच कायापालट केल्याचे दिसून येते.
अर्थात, त्याची सुरुवात नरेंद्र मोदींनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघ निवडण्यापासूनच झाली होती. भारताच्या पाच हजारच नव्हे, तर त्याआधीच्याही हजारो, लाखो वर्षांच्या इतिहासकाळापासून ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून काशीची ओळख आहे. डाव्या इतिहासकारांनी भारताचे ऐतिहासिक एकत्व आणि अखंडत्व नाकारलेले असले तरी मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या विचारधारेने राज्यकर्ता कोणीही असो, भारत सांस्कृतिकदृष्ट्या सदैव एकता व अखंडतेनेच बांधलेला होता, असे प्रतिपादित केले. भारताच्या सांस्कृतिकदृष्ट्या एकराष्ट्रीयत्वाचे, चेतनेचे प्रतीक म्हणून काशीचेच नाव समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी विचारपूर्वक वाराणसी मतदारसंघाची निवड केली. आपल्या प्रत्येक कृतीतून योग्य तो संदेश, योग्य त्या व्यक्तींना देण्याची विलक्षण हातोटी असलेल्या नरेंद्र मोदींनी इथेही हिंदूंना व हिंदुत्ववाद्यांना संदेश दिला होता. तो संदेश कोणता, याची प्रचिती ‘काशिविश्वनाथ धाम’च्या लोकार्पणातून सर्वांनाच आल्याचे दिसते.
न्यायालयीन निकालानंतर अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिराची निर्मिती केली जात आहे. पण, डाव्या विचारांच्या गटापासून ते इस्लामी कट्टरपंथियांपर्यंत प्रत्येक जण बाबरीच्या पुनर्उभारणीचे स्वप्न पाहत असतो. बाबरी ढाँचा पाडल्याची घटना ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा, वाद घडवून आणत असतो. पण, काशिविश्वनाथाच्या बाबतीत मात्र तसे काही होऊ शकत नाही. कारण, इथे नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी असताना पुढाकार घेऊन, स्वतःच्या अधिकारात, ‘काशिविश्वनाथ धाम’ची निर्मिती करत देशवासीयांना, हिंदूंना, हिंदुत्ववाद्यांना आता कोणी बोट उचलणार नाही, विरोध करणार नाही, अराजक माजवणार नाही, ही मानसिक सुरक्षा दिल्याचे स्पष्ट होते. डावे गट वा धर्मांधांना कितीही पोटदुखी होत असली, तरी ते ‘काशिविश्वनाथ धाम’विरोधात गरळ ओकू शकत नाहीत वा कृतीही करू शकत नाहीत, ही मानसिक सुरक्षा, हा नकळत कृतिरूप संदेश नरेंद्र मोदींनी स्वहस्ते लोकार्पणातून, स्वतः उपस्थित राहण्यातून, कार्यक्रमाचा भाग होण्यातून, पवित्र गंगा नदीत डुबकी मारण्यातून दिला आहे. आता ‘काशिविश्वनाथ धाम’ येणार्या कित्येक शतकांपर्यंत, सहस्त्रकांपर्यंत, युगांपर्यंत दिमाखाने लखलखण्यासाठी सज्ज झालेले आहे, कोणत्याही धोक्याशिवाय!
‘काशिविश्वनाथ धाम’चे लोकार्पण होत असतानाच सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचाही उल्लेख करायला हवा. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण सोमनाथ मंदिरासह देशाच्या सांस्कृतिक मानबिंदूंची पुनर्प्रतिष्ठापना होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याला पूर्णत्व येणार नाही, याला सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्राधान्य दिले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी मात्र तसे होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले. देशात स्वातंत्र्यापासूनच दोन विचारधारा अस्तित्वात होत्या. त्यातल्या एका विचारधारेला देशाची उभारणी युरोपियन धर्तीवर करायची होती, तर दुसर्या विचारधारेला देशाची उभारणी आपल्या सांस्कृतिक संचिताच्या आधारावर करायची होती. पहिल्या विचारधारेचे प्रतिनिधित्व जवाहरलाल नेहरु, तर दुसर्या विचारधारेचे प्रतिनिधित्व वल्लभभाई पटेल करत होते.
ते दोघेही काँग्रेसमध्येच कार्यरत होते, पण पटेलांच्या निधनानंतर काँग्रेसमधील दुसरी विचारधारा संपली. आज मात्र भारतीय जनता पक्षाच्या रुपात देशाची उभारणी आपल्या सांस्कृतिक संचिताच्या आधारावर करायला हवी, असे मानणारी विचारधारा प्रबळ, सत्ताधारी झाल्याचे आणि त्याचेच प्रतिबिंब ‘काशिविश्वनाथ धाम’च्या लोकार्पणातून दिसत आहे. विशेष म्हणजे, सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला जवाहरलाल नेहरु गेले नव्हते. इतकेच नव्हे, तर पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही तिथे जाऊ नये म्हणून नेहरुंनी आडकाठी आणली होती. पण, आज मात्र अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून ‘काशिविश्वनाथ धाम’चे लोकार्पणदेखील खुद्द पंतप्रधानच करत आहेत. गेल्या ७५ वर्षांतला हा मोठा आणि समस्त हिंदू व हिंदुत्ववाद्यांसाठी आनंदाचा क्षण!
त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या ‘हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही,’ या विधानाकडे पाहायला हवे. औरंगजेबासमोर लाचार झालेल्या मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्यावर चाल करुन येताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी दैवी प्रयोग, अनुष्ठाने, ११ कोटी शिवलिंगे, कोटीचंडीसारखे जप-जाप्य, यज्ञ-याग केले. पुढे पुरंदरचा तह होऊन शिवाजी महाराजांना औरंगजेबाकडे आग्र्याला जावे लागले, पण नंतर औरंगजेबाला चकवून शिवराय पुन्हा महाराष्ट्रात परतले आणि स्वराज्याचे कार्य सुरळीत केले. इथला फरक हाच की, मिर्झा राजे जयसिंग स्वतःच्या पारलौकिक भल्याचा, प्रार्थना-होम-हवन करुन मिळणार्या पुण्याचा विचार करणारे पारंपरिक हिंदू होते. त्या हिंदूंच्या रक्षणासाठी उभे ठाकलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाचा अतुलनीय आविष्कार होते.
म्हणूनच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वयंसेवकांसमोर व्यक्तिरूप आदर्श ठेवला, तो फक्त शिवाजी महाराजांचाच! नरेंद्र मोदीदेखील त्याच विचारधारेतले, विचार परंपरेतले आणि आजचे ‘काशिविश्वनाथ धाम’चे लोकार्पण त्यातूनच साकार झाले. हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि राहुल गांधी वा शशी थरुर यांच्यासारख्यांना औरंगजेबी पिलावळीपासून सुरक्षित राहत, ‘हिंदू’ या ओळखीने जीवन जगायचे असेल, तर हिंदुत्ववादी नेतृत्वच लागेल. तथापि, ते त्यांना इतक्यात समजेल, असे नाही. त्यावरही स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित एक प्रसंग सांगितला पाहिजे.
१९४० साली समाजवादी मंडळींकडून पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते व त्यात एस. एम. जोशींनी, “आम्हाला १९०७ सालचे सावरकर हवेत, आताचे नाही!” असे विधान केले होते. त्यावर, “तुम्हाला १९०७ सालचे सावरकर कळायला इतकी वर्षे लागली, तर आजचे सावरकर कळायला आणखी कैक वर्षे लागतील,” असे उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले होते. आज तशीच परिस्थिती राहुल गांधींची झाली आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सात दशके गांधी-नेहरु घराणे व काँग्रेसने देश हिंदूंचा असल्याचे मान्य केले नाही. आज मात्र हिंदूशक्ती जागृत झाल्याने गांधी-नेहरु घराण्याच्या वारसांना देश हिंदूंचा आहे, हे कळले आणि हिंदुत्ववाद कळायला पुढची २५ वर्षे लागतील.
मात्र, तोपर्यंत हिंदुत्वाचा वसा घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणारा हिंदू समाज हिंदुत्वासाठीची अशी अनेकानेक कार्य आणखी देदीप्यमान करेल. त्याच कार्यापैकी एक असलेल्या आताच्या ‘काशिविश्वनाथ धाम’च्या लोकार्पण कार्यक्रमावेळी देशाच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन, कार्यक्रमात सहभागी होऊन, गंगास्नान करून एका अर्थाने यापुढे इथे अशांतता, अव्यवस्था, अस्थैर्य माजणार नसल्याचा व हिंदू-हिंदुत्वाच्या रक्षणाचा कृतिरूप संदेश-मानसिक सुरक्षा दिल्याचे स्पष्ट होते.